दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर प्रशासन सजग
By Admin | Updated: August 9, 2014 00:28 IST2014-08-09T00:17:40+5:302014-08-09T00:28:33+5:30
हिंगोली : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासन सजग झाले आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर प्रशासन सजग
हिंगोली : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासन सजग झाले आहे. येत्या १५ ते २0 आॅगस्टपर्यंत पाणी व चाराटंचाईबाबतचा गावनिहाय आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी टी. जी. कासार यांनी आज झालेल्या बैठकीत दिले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, उपविभागीय अधिकारी खुदाबक्ष तडवी, उपजिल्हाधिकारी बी. एम. निलावाड, पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता गंगाधर एंबडवार, चंद्रशेखर सरोदे, एम. आर. कोपलवार आदी अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात १५ ते २0 टक्के पर्जन्यमान असल्याने पिकांची स्थिती गंभीर आहे. त्यातच भविष्यात अशीच परिस्थिती राहिल्यास पाणी व चाराटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमिवर खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजनाचे आदेश दिले आहेत.
सध्या कोठेही टंचाईची स्थिती नसली तरी ज्या गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेचे काम झाले. ते पूर्ण झाले असेल तर ती योजना कोणत्याही परिस्थितीत कार्यान्वित झाली पाहिजे, अशी भूमिका जिल्हाधिकारी कासार यांनी मांडली. तर तयार असलेल्या सर्व ७६ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचे ठरले.
पाणीसाठा राखीव करण्यासाठी जिल्हा प्रशासन व जि.प.ने पेयजल सुरक्षित अधिनियमानुसार संयुक्त जाहीरनामा काढण्याचे ठरले. त्यात जलसाठ्यांतून पिण्यासाठी सोडला तर इतर कोणत्याही कारणासाठी पाणीउपसा करू नये, असे आदेश देण्यात येणार आहेत. याशिवाय महावितरण कंपनीने वीज जोडणी तोडून पाणीउपसा होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असेही सुचित केले.
वैरण विकास कार्यक्रमांतर्गत ७५00 हेक्टरवर चारा पीक घेण्यात येणार आहे. त्यात मका, न्यूट्रीफिड गवत, बाजरी प्रत्येक तालुक्यात १५00 हेक्टरवर घेण्यात येणार आहे. कृषी विभागातर्फे बियाणे वाटप होईल.
पशुसंवर्धनतर्फेही बियाणे वाटप करून चारा पीक घेण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. जि.प.नेही शेष निधीतून असा उपक्रम राबविण्याची सूचना दिली. जिल्ह्यात ३ लाख ६३ हजार ८७३ जनावरे असून त्यासाठी प्रतिदिन २ हजार मे. टन चारा आवश्यक असल्याचे पशुसंवर्धन विभागाने सांगितले. लघुसिंचन विभागातर्फे पाचही तालुक्यांत प्रत्येकी दोन गावांत जलसंधारणाची कामे सुरू असून २.७८ कोटींचा निधी मंजूर आहे, असे लघुपाटबंधारेचे कोपलवार यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)