पोलिस पाटलांविना ६१ गावांचा कारभार
By Admin | Updated: September 1, 2014 00:27 IST2014-09-01T00:08:27+5:302014-09-01T00:27:13+5:30
पालम :तालुक्यातील तब्बल ६१ गावांचा कारभार पोलिस पाटलांविना चालत आहे़

पोलिस पाटलांविना ६१ गावांचा कारभार
पालम : ग्रामीण भागात गावोगाव शांतता प्रस्थापित करून प्रशासनाला मदत करण्यासाठी पोलिस पाटील महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात़ परंतु, तालुक्यातील तब्बल ६१ गावांचा कारभार पोलिस पाटलांविना चालत आहे़ यामुळे महसूल व पोलिस यंत्रणेला गावोगाव कामे करण्यासाठी कसरती कराव्या लागत आहेत़
पालम तालुक्यात वाडी तांड्यांसह ८२ गावांचा समावेश आहे़ तर ६७ ग्रामपंचायतीअंतर्गत शासनाची विविध विकासकामे व योजना राबविल्या जातात़ प्रशासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून पोलिस पाटलाकडे पाहिले जाते़ शासकीय यंत्रणेचा विश्वासू म्हणून पोलिस पाटलावर अधिकारी व कर्मचारी अनेक कामे सोपवित असतात़ त्यासाठी पोलिस पाटलांना दरमहा शासन मानधन देते़
गणेशोत्सव, रमजान, निवडणुका यासह विविध कामे पोलिस पाटलांना पहावी लागतात़ परंतु, तालुक्यात केवळ २१ गावांमध्ये पोलिस पाटील कार्यरत आहेत़ ६१ गावांतील पदे रिक्त असल्यामुळे पोलिस पाटलाविना या गावांचा कारभार सुरू आहे़ (प्रतिनिधी)