अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन लवकरच

By Admin | Updated: June 28, 2016 00:50 IST2016-06-28T00:33:07+5:302016-06-28T00:50:35+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात ज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या अत्यंत कमी आणि तेथे अध्यापनासाठी शिक्षक जास्त असल्याचा अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांनी

Adjusting additional teachers soon | अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन लवकरच

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन लवकरच


औरंगाबाद : जिल्ह्यात ज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या अत्यंत कमी आणि तेथे अध्यापनासाठी शिक्षक जास्त असल्याचा अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आज सोमवारी शिक्षण समितीच्या बैठकीत सादर केला. त्यानुसार जि.प.च्या अशा १५४ शाळांतील शिक्षकांचे समायोजन जिथे विद्यार्थी संख्या अधिक आहे; पण तिथे शिक्षकांची संख्या कमी आहे, त्या शाळांवर करण्याचा निर्णय सभापती विनोद तांबे यांनी घेतला.
यासंबंधीचा प्रस्ताव लगेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी पाठविला जाईल. शाळांच्या गरजेनुसार प्रत्येकी एक याप्रमाणे शिक्षकांना तेथे पाठविले जाईल. नुकतेच जिल्ह्यात विनाअनुदानित तत्त्वावर ३०९ नवीन शाळा सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या शाळांना महिनाभराच्या आत जि. प. शिक्षण समितीकडून ३:१ ची मान्यता घेणे बंधनकारक असते. त्यानुसार जिल्ह्यात नव्याने सुरू होणाऱ्या या शाळांवर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्या असून, आठ दिवसांत यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे त्यांना सांगितले आहे. शासनाची मान्यता मिळालेल्या या शाळांना ३:१ ची मान्यता देण्यापूर्वी संबंधितांनी शाळा सुरू करण्याबाबतच्या निकषांची पूर्तता करण्यात आलेली आहे की नाही, याची पडताळणी केली जाईल.
अलीकडे अनेक ठिकाणच्या जि. प. शाळांमध्ये ८ वी व ९ वीचे वर्ग सुरू करण्याची पालकांची मागणी आहे. त्यानुसार शासन निर्णयाच्या अधीन राहून असे वर्ग सुरू करण्यास जि. प. शाळांच्या मुख्याध्यापकांना आदेश दिले जाणार असल्याचे शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी सांगितले.
या बैठकीस बबन कुंडारे, प्रभाकर काळे, संतोष माने, मधुकर वालतुरे, श्याम राजपूत, आबा जगताप, पुष्पा जाधव, संगीता सुंब, शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल, उपशिक्षणाधिकारी रमेश तांगडे, सरताज खान पठाण आदींची उपस्थिती होती.
जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून १ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या निधीतून अवघ्या ३३ शाळांची दुरुस्ती होऊ शकते. मात्र, सद्य:स्थितीत जवळपास ६० ते ७० शाळा इमारती ४५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या आहेत. जवळपास २५० ते ३०० शाळांच्या इमारती दुरुस्तीला आलेल्या आहेत. यासाठी पालकमंत्री रामदास कदम आणि जिल्हाधिकारी निधी पांडे यांच्याकडे शाळा इमारतींच्या दुरुस्तीसाठी ३ कोटी रुपयांचा जास्तीच्या निधीची मागणी केली जाणार आहे, असे शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी सांगितले.

Web Title: Adjusting additional teachers soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.