अपघाताने रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर
By Admin | Updated: June 12, 2014 00:12 IST2014-06-12T00:01:29+5:302014-06-12T00:12:38+5:30
विठ्ठल भिसे, पाथरी पाथरी तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते अत्यंत खराब झाले आहेत़ या रस्त्यावरून महामंडळाच्या बसेसच्या फेऱ्या होणेही मुश्कील झाले आहे़
अपघाताने रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर
विठ्ठल भिसे, पाथरी
पाथरी तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते अत्यंत खराब झाले आहेत़ या रस्त्यावरून महामंडळाच्या बसेसच्या फेऱ्या होणेही मुश्कील झाले आहे़ प्रवाशांच्या रेट्यामुळे महामंडळाच्या बसेस सुरू राहतात खऱ्या़ परंतु, गुंजजवळ महामंडळाची बस रस्त्यावरून खड्डे चुकविताना रस्त्याच्या बाजुच्या खड्डयात कोसळून अपघात झाला़ यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे़
पाथरी तालुक्यात ग्रामीण भागातून शहराला जोडणारे रस्ते गेल्या अनेक वर्षांपासून पूर्णत: खराब झालेले आहेत़ दरवर्षी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी किरकोळ निधी उपलब्ध होतो़ यातून दुरुस्ती केल्या जाते़ परंतु, रस्त्यांची अवस्था मात्र कायमची दुरुस्त होताच नाही़ पर्यायाने ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते़ तसेच दळणवळणासाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाल्याने त्याचा शेती मालावरही परिणाम होऊ लागला आहे़ गोदाकाठच्या भागामध्ये युती शासनाच्या काळात शहराला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे डांबरीकरणाने पूर्ण झाली़ त्यानंतर मात्र या रस्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याने आज हे रस्ते पूर्णत: उखडून गेले आहेत़ महामंडळाच्या बसेस ग्रामीण भागात धावतात खऱ्या़ परंतु, खराब रस्त्यामुळे अनेक वेळा बसेस मधेच बंद पडतात़ यामुळे प्रवाशांचीही मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते़ महामंडळाच्या बसेस अगोदरच नादुरुस्त आणि त्यातच खराब रस्ते़ यामुळे या रस्त्यावर महामंडळाच्या बसेसच्या रहदारीची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली़ पाथरी- उमरा रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी गुंज गावानजीक महामंडळाची बस खराब रस्त्यामुळे खड्डयात कोसळून अपघात झाला़ या अपघातात मोठी जिवीत हानी झाली नसली तरी यामुळे रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ आता तरी लोकप्रतिनिधींनी ग्रामीण भागाच्या रस्त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे़
बसफेऱ्या होतात कपात
पाथरी-उमरा ही बस अनेक वर्षांपासून धावते़ या बसला मोठे उत्पन्नही आहे़
हा रस्ता अत्यंत खराब झाल्याने गेल्या वर्षभरात महामंडळाने अनेकवेळा या मार्गावरील या बसच्या फेऱ्यांमध्ये कपात केली़
पर्यायाने या भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गैरसोयींचा सामनाही करावा लागला़
शहरामध्ये शालेय शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींसोबतच विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे़ खराब रस्त्यामुळे महामंडळाच्या बसेस बंद झाल्या तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्नही उपस्थित होणार आहे़
मानव विकासच्या बसेवर परिणाम
राज्य शासनाने मानव विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शहरात शिक्षणासाठी येण्यासाठी बसेसची व्यवस्था केली खरी़ परंतु, या तालुक्यात ग्रामीण भागातील रस्ते खराब झाल्याने आणि महामंडळाच्या बसेसला खराब रस्त्यामुळे अपघात होत असल्याने मानव विकासच्या बसेवरही याचा परिणाम जानवणार आहे़
ग्रामीण भागाला जोडणारे बहुतांश रस्ते खराब आहेत़ या रस्त्यांवर गाडे चालविणे महामंडळाच्या चालकांना मोठी कसरत करावी लागते़ बऱ्याच वेळा चालक खराब रस्त्यामुळे या मार्गावरून गाड्या नेण्यासही टाळाटाळ करतात़