पावसाची गैरहजेरी; धान्य मालाची आवक घटली

By Admin | Updated: July 21, 2014 00:24 IST2014-07-20T23:16:06+5:302014-07-21T00:24:16+5:30

जालना : पावसाने दडी मारल्यामुळे जालना बाजापेठेत सर्व प्रकारच्या धान्य मालाची आवक मंदावली आहे.

Absence of rain; Grain rises in arrivals | पावसाची गैरहजेरी; धान्य मालाची आवक घटली

पावसाची गैरहजेरी; धान्य मालाची आवक घटली

जालना : पावसाने दडी मारल्यामुळे जालना बाजापेठेत सर्व प्रकारच्या धान्य मालाची आवक मंदावली आहे. धान्यमालासोबतच किराणा मालाच्या दरातही तेजी सुरू झाली आहे. सोने, चांदीच्या दरात जास्त चढ उतार नाही, मात्र ग्राहकी मंदावली आहे.
पावसाच्या गैरहजेरीचा थेट परिणाम जालना बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात आता जाणवू लागला आहे. एरव्ही दररोज सरासरी दहा हजार पोत्यांची आवक असणाऱ्या बाजारपेठेत सध्या सर्व प्रकारच्या धान्याची आवक जेमतेम ४०० ते ५०० पोती इतकीच आहे. गव्हाच्या दरात ५० रूपयांची तेजी आली असून भाव १६०० ते २४०० रूपये प्रतिक्विंटल असे आहेत. ज्वारीची आवक दररोज १०० पोती इतकी असून त्यात ५०० रूपयांची तेजी आली आहे. भाव १५०० ते ३२०० रूपये प्रतिक्विंटल असे आहेत. पशुखाद्य तसेच दारू बनविण्यासाठी लागणारी काळी ज्वारीही बाजारात उपलब्ध असून त्याचा भाव १३०० ते १३२५ रूपये प्रतिक्विंटल असे आहेत. बाजरीची आवक दररोज २० ते ३० पोते इतकी असून ५० रूपयांची तेजी आल्यानंतर भाव ११५० ते १६०० रूपये प्रतिक्विंटल असे आहेत. मक्याची आवक अत्यल्प असून १०० रूपयांची तेजी आल्यामुळे भाव १३०० ते १४०० रूपये प्रतिक्विंटल असे आहेत. तुरीची आवक ५० पोते इतकी असून १०० रूपयांची वाढ झाल्यानंतर भाव ३८०० ते ४५०० रूपये प्रतिक्विंटल असे आहेत, अश्ी माहिती अडत व्यापारी सुरेश लुणावत यांनी दिली. सर्व प्रकारच्या डाळी १०० ते ५०० रूपयांनी महागल्या आहेत. सध्याचा उत्पादन साठा कमी असल्यामुळे आणि पाऊस नसल्याने डाळींमध्ये तेजी आली आहे. हरभरा डाळा ३३०० ते ३६००, तूरडाळ - ६१०० ते ६९००, मुगदाळ - ८५०० ते ९०००, मसूरडाळ - ६२०० ते ६४०० असे भाव आहेत.
किराणा मालात तेजी
उपवासाला लागणाऱ्या किराणा मालातही १०० ते ५०० रूपयांची तेजी आली आहे. शेंगणदाण्याचे दर ५२०० ते ६५००, साबुदाणा ६५०० ते ७५००, भगर ५५०० ते ७५०० आणि पेंडखजुराचे दर ३००० ते ५५०० रूपये प्रतिक्विंटल असे आहेत, अशी माहिती किराणा व्यापारी जितेंद्र गर्ग यांनी दिली.
गुंटूरची लाल मिरची ५०० रूपयांनी महाली असून भाव ८००० ते ९००० रूपये प्रतिक्विंटल असे आहेत. स्थानिक लाल मिरचीची आवक नगण्य आहे, अशी माहिती सुरेश भक्कड यांनी दिली.
केंद्र सरकारने तंबाखूजन्य वस्तूंवर ज्यादा कर आकारल्याने सिगारेट, बिडी, तंबाखूचे दर वाढले आहेत. परंतु कोणत्या वस्तूवर किती कर वाढला याचा विस्तृत खुलासा न झाल्याने गोंधळाचे वातावरण आहे.
धान्य बाजारातही ग्राहकांना आकर्षित करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. ज्वारी मशीनद्वारे स्वच्छ करून तीस किलोच्या आकर्षक पॅकमध्ये काही व्यापारी विकत आहेत. आजच्या धावपळीच्या जमान्यात या नवीन उपक्रमाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: Absence of rain; Grain rises in arrivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.