राम तत्तापूरे , अहमदपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना आरटीई अधिनियम २००९ नुसार शैक्षणिक वर्ष २०१४-१५ साठी इयत्ता पाचवीच्या ४८ वर्गशाळा तर आठवीच्या ८ आठ वर्गशाळांना शासनस्तरावर मान्यता मिळाल्याने खाजगी शिक्षण संंस्थांतील शाळांप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळा अधिक दर्जेदार व संस्कारक्षम होणार आहेत़ अहमदपूर शहर सबंध महाराष्ट्राच्या नकाशावर शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाते़ याठिकाणी खाजगी शिक्षण संस्थांतील शिक्षण व जि़प़च्या शाळांतील शिक्षण अधिक दर्जेदार व संस्कारक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षकांचा तळमळीचा प्रयत्न असतो़ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची संख्या १७२ असून, केंद्र १४ तर बीट ५ आहेत़ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची संख्या ७०६ आहे़ मान्यताप्राप्त मुख्याध्यापकांची पदे ५३ असून, त्यातील ३७ ठिकाणी मुख्याध्यापक आहेत़ तर १६ ठिकाणची पदे रिक्त आहेत़ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची ६ पदे रिक्त तर केंद्रप्रमुखांचे एक पद रिक्त आहे़ तालुक्यामध्ये वर्ग २ च्या मुख्याध्यापकांची पदे ६ असून, त्यापैकी अहमदपूर शहरातील जिल्हा परिषद प्रशाला मुलांचे या शाळेतील मुख्याध्यापकांचे १ पद भरले आहे़ उर्वरित ५ पदे अद्यापही रिक्तच आहेत़ तालुक्यातील १६ जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत़ त्यामध्ये जिल्हा परिषद प्रशाला चिलखा, किनीकदू, हिप्परगा, कोपदेव, रूद्धा, धानोरा बु़, टेंभूर्णी, कुमठा, थोडगा, हडोळती, टाकळगाव, कामखेडा, लांजी, सरणी, हिंगणगाव, विळेगाव, चिखली, काळेगाव आदी शाळांतील मुख्याध्यापकांच्या जागा रिक्त असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे़ त्यामुळे शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांच्या रिक्त जागा त्वरित भरण्यात यावा, अशी मागणी शिक्षणप्रेमी नागरिकांतून होत आहे़ येत्या जूनपासून आरटीई कायद्याप्रमाणे शाळेची व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी नवनवीन प्रयोग करणार असून, १०० टक्के उपस्थिती, शिष्यवृत्ती व विविध स्पर्धा परीक्षेला बसविणार असून, या माध्यमातून शाळाबाह्य मुलेही शिक्षणाच्या प्रवाहात आणणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी एल़एम़डुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़
पाचवीच्या ४८ तर आठवीच्या ८ शाळांना मान्यता़़़
By admin | Updated: May 23, 2014 00:18 IST