छाप्यात ८,४०० लिटर रॉकेल केले जप्त
By Admin | Updated: August 13, 2015 00:22 IST2015-08-13T00:12:30+5:302015-08-13T00:22:39+5:30
नळदुर्ग : काळाबाजार करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवलेले ८ हजार ४०० लिटर रॉकेल आणि ५५ क्ंिवटल धान्य पोलिसांनी मंगळवारी छापा मारून जप्त केले होते.

छाप्यात ८,४०० लिटर रॉकेल केले जप्त
नळदुर्ग : काळाबाजार करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवलेले ८ हजार ४०० लिटर रॉकेल आणि ५५ क्ंिवटल धान्य पोलिसांनी मंगळवारी छापा मारून जप्त केले होते. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील इटकळ शिवारातील एका शेडमध्ये रेशनचे धान्य आणि रॉकेलचा साठा करून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पोलिसांनी सदरील शेडवर छापा मारला असता दोनशे लिटरचे तब्बल ४२ बॅरल रॉकेल (८४०० लिटर), ५० किलो वजानाचे ६० कट्टे गहू आणि ५२ कट्टे तांदूळ आढळून आला. रात्री उशिरापर्यंत पोलिस मालाचे नमुने, वजन-मापे घेत होते. या प्रकरणी तुळजापूर ठाण्याचे सपोनि किरण दामोदर दांडगे यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर रज्जाक कचरू पठाण (रा. काटगाव) व जावेद महेबूब नदाफ (रा. केशेगाव) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. उपरोक्त दोघांनाही तुळजापूर न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास सपोनि फुलचंद मेंगडे हे करीत आहेत. (वार्ताहर)
शासनाच्या निकषानुसार प्रति कार्ड दोन लिटर या प्रमाणे पोलिसांनी जप्त केलेले ८४०० लिटर रॉकेल हे किमान ४ हजार २०० लाभार्थ्यांचे आहे. ३००० किलो गहू हे एक हजार युनिटधारकांचे आहे. तर २९०० किलो तांदूळ हा १ हजार ३०० युनिटधारकांचा आहे. त्यामुळे उपरोक्त साठा करून ठेवणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी लाभार्थ्यांतून जोर धरू लागली आहे.