८० लाखांची वीज बिले माफ
By Admin | Updated: May 28, 2014 01:12 IST2014-05-28T00:58:02+5:302014-05-28T01:12:15+5:30
विजय गायकवाड, वैजापूर फेबु्रवारी-मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे तालुक्यातील ७५ गावांमधील जवळपास २ हजार शेतकर्यांच्या कृषिपंपाची वीज देयके माफ करण्यात आली आहेत

८० लाखांची वीज बिले माफ
विजय गायकवाड, वैजापूर फेबु्रवारी-मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे तालुक्यातील ७५ गावांमधील जवळपास २ हजार शेतकर्यांच्या कृषिपंपाची वीज देयके माफ करण्यात आली आहेत. आपद्ग्रस्त शेतकर्यांचे जानेवारी ते जून असे ६ महिन्यांची ८० लाख रुपयांची देयके माफीत बसणार आहेत. फेबु्रवारी-मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीने तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले. या गारपिटीने फळबागांसह ऊस, कांदे व अन्य बागायती पिके उद्ध्वस्त झाली होती. त्यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर तहसील प्रशासनाने तात्काळ गारपीटग्रस्त गावांचे पंचनामे करून अहवाल शासनस्तरावर सादर केला. गारपिटीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शासनाने आपद्ग्रस्त गावांतील शेतकर्यांची विज देयके माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महावितरण कार्यालयाने तहसील कार्यालयाकडून आपद्ग्रस्त गावांची यादी मागवून पात्र ग्राहकांची वीज देयके माफ क रण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महावितरणच्या उपविभाग क्र. १ व २ अंतर्गत आपद्ग्रस्त ग्राहकांची संख्या जवळपास २ हजार आहे. अशा या पात्र शेतकर्यांना जानेवारी ते जून महिन्यापर्यंतची वीज देयके माफ करण्यात येणार आहेत. साधारणत: कृ षिपंपाच्या सहा महिन्यांच्या देयकापोटी शासनाला ८० लाख रुपयांचा फटका पडणार आहे. तालुक्यातील कोरडगाव, हिलालपूर, पेंडेफळ, दहेगाव, गोलवाडी, पालखेड, खिर्डी, हरगोविंदपूर, भऊर, किरतपूर, लाखणी, पाथ्री, बायगाव, वीरगाव, मुर्शदपूर, सिद्धापूरवाडी, म्हस्की, भगूर, जळगाव, नांदगाव, चांडगाव, पानवी खंडाळा, पानवी खुर्द, बोरसर, खंबाळा, डवाळा, आलापूरवाडी, साफियाबादवाडी, शिऊर, महालगाव, माळीघोगरगाव, नादी, वक्ती, पानवी बु., जातेगाव, कौैटगाव, टेंभी, सटाणा, नागमठाण, अव्वलगाव, लाख खंडाळा, घायगाव, गाढेपिंपळगाव, वांजरगाव, सावखेडगंगा, हनमंतगाव, कापूसवाडगाव, नांदूरढोक, हमरापूर, वैजापूर, भग्गाव, सुराळा, बेलगाव, अगरसायगाव, शिवराई, नगिनापिंपळगाव, चेंडूफळ, सिरसगाव, जांबरगाव, मकरमतपूर, बाजाठाण, देवगाव शनी, तिडी, लाखगंगा, बाबतारा, डोणगाव, बाभूळगाव गंगा, बिलोणी, गोयगाव, फकिराबादवाडी, लाडगाव, चोरवाघलगाव व अन्य तीन अशा एकूण ७५ गावांतील आपद्ग्रस्त शेतकर्यांना या वीजमाफीचा फायदा होणार आहे. दरम्यान, आपद्ग्रस्त गावातील ज्या शेतकर्यांना वीजमाफीचा फायदा मिळाला नाही त्यांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे. तालुक्यात झालेल्या पिकांच्या नुकसानभरपाईपोटी शासनाकडून ७५ गावांसाठी २० कोटी ६ लाख ३८ हजार ४३ रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. गारपिटीने तालुक्यातील ७५ गावांतील १० हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. या नुकसानभरपाईपोटी २१ हजार ६७५ शेतकर्यांना आतापर्यंत १५ कोटी ४२ लाख ८५ हजार ७५ रुपयांचे वाटप करण्यात आले. शासनाने नुकसान झालेल्या फळबागांसाठी प्रतिहेक्टरी २५ हजार, बागायती १५ हजार व जिरायती पिकांसाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपये मदत जाहीर क रण्यात आली होती, असे तहसीलदार डॉ.प्रशांत पडघन व योगेश पुंड यांनी सांगितले.