विशेष घटक योजनेसाठी ७.६९ कोटींचा निधी
By Admin | Updated: August 18, 2014 00:59 IST2014-08-18T00:30:32+5:302014-08-18T00:59:02+5:30
जालना : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाअंतर्गत अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) अंतर्गत २०१४-१५ या वर्षासाठी लाभार्थ्यांना ७ कोटी ६९ लाख रुपयांचा

विशेष घटक योजनेसाठी ७.६९ कोटींचा निधी
जालना : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाअंतर्गत अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) अंतर्गत २०१४-१५ या वर्षासाठी लाभार्थ्यांना ७ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी शेतीशी संबंधित विविध साहित्य खरेदी तसेच विहिरींसाठी देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या विषयाला मंजुरी देण्यात आली. अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसहाय्य देण्याची योजना राबविण्यात येत आहे. मागील २०१३-१४ मध्ये १ कोटी ६९ लाख ३३ हजार रुपयांची अतिरिक्त निधी रक्कम प्राप्त झाली होती. या रक्कमेसह २०१४-१५ या वर्षासाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे.
मंजूर जमीन सुधारणा प्रात्यक्षिकासाठी निविष्ठा वाटप, पीकसंरक्षण, शेतीची सुधारित औजारे बैलजोडी, रेडेजोडी, जुनी विहिर दुरूस्ती, इनवेल बोअरिंग पाईपलाईन पंपसंच, नवीन विहिर शेततळे, पारसबाग कार्यक्रम, तुषार/ठिबक सिंचन संच पुरवठा ताडपत्री अशा चौदा घटकांच्या माध्यमातून अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सहाय्य देऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचावणे हा या योजनेचा उद्देश आहे.
या योजनेतील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार १ लाख रुपये किंवा ५० हजार रुपयांच्या मर्यादेत शेतकऱ्यांना लाभ देय आहे. या योजनेसाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागविणे, पात्र लाभार्थ्यांची निवड करून त्यांना लाभ देण्यात येतो. गतवर्षी सदर योजनेसाठी १ हजार ५४ लाभार्थ्यांची निवड झाली होती.त्यातील ५९१ लाभार्थ्यांना विहीर तर ५०८ लाभार्थ्यांना इतर औजारांसाठी अनुदान देण्यात आले.
५ कोटी ९१ लाखांचा निधी खर्चित झाला. एकूण ८ कोटी ४५ लाखांचा लाभ देण्यासाठी वरील लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती.
.या योजनेचा लाभ दोन वर्षांसाठी देता येत असल्याने गतवर्षी ज्यांना लाभ मिळाला नाही, त्यांना यावर्षी लाभ मिळू शकणार आहे.
मागील वर्षी ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केले होते, त्यात कृती पूर्ततेमध्ये जे पात्र झाले, त्यांना प्राधान्याने लाभ देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)