रेल्वे अपघाताचे ३ महिन्यात ७ बळी
By Admin | Updated: May 19, 2014 01:08 IST2014-05-19T00:48:58+5:302014-05-19T01:08:49+5:30
जालना : गेल्या तीन महिन्यात जालना रेल्वे पोलिस चौकीच्या हद्दीत रेल्वे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून वेगवेगळ्या अपघातात सात जण ठार झाले.
रेल्वे अपघाताचे ३ महिन्यात ७ बळी
जालना : गेल्या तीन महिन्यात जालना रेल्वे पोलिस चौकीच्या हद्दीत रेल्वे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून वेगवेगळ्या अपघातात सात जण ठार झाले. तर तिघे जण जखमी झाले आहेत. दरम्यान, मृतांमधील तिघांची ओळख अद्यापही पटलेली नाही. १८ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास रामेश्वर दादाराव खैरे (वय २८, रा. जयभवानी नगर, औरंगाबाद) हा युवक धावत्या रेल्वेतून पडून ठार झाला. मराठवाडा एक्स्प्रेस जालना स्थानकात आल्यानंतर हा प्रकार घडला. सुरूवातील गंभीर जखमी झालेल्या रामेश्वर यास उपचारासाठी सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना तो मरण पावला. १८ फेबु्रवारी ते १८ मे या तीन महिन्यांच्या काळात रेल्वे अपघाताच्या दहा घटना घडल्या. यात १८ फेबु्रवारी रोजी औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजरमधून पडल्याने ५५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. ३० मार्च रोजी मालगाडीच्या धक्क्याने जालना स्थानक परिसरातच राजेश एकनाथ काळे (वय ३०, गायत्रीनगर, सेलू) यांचा मृत्यू झाला. ८ एप्रिल रोजी ४५ वर्षीय अनोळखी इसम धावत्या रेल्वेतून पडून ठार झाला. १७ एप्रिल रोजी मंजुषा राजू गुट्टे (वय २५, रा. लक्ष्मीनगर, जालना) या महिलेचा रेल्वेचा धक्का लागून मृत्यू झाला. २५ एप्रिल रोजी नूतन वसाहत उड्डाणपुलाखाली शेख शाहेद शेख नसीर (वय ६) हा बालक रेल्वेखाली सापडून मरण पावला. तर २९ एप्रिल रोजी एका ३० वर्षीय अनोळखी तरूणाचा सारवाडी स्थानकानजीक रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला. याशिवाय तीन घटनांमध्ये तिघेजण जखमी झाले. यात २४ फेबु्रवारी रोजी करमाड-बदनापूर लोहमार्ग दरम्यान, कलावती तुलसी गुणावत (वय ७०, रा. राजेवाडी, ता. बदनापूर) ही वृद्ध महिला मनमाड पॅसेंजरमधून पडल्याने जखमी झाली. ३० मार्च रोजी सुलोचना प्रभूजी कव्हळे (वय ५५, रा. उमरी, जि. नांदेड) ही महिला मराठवाडा एक्प्रेसमधून पडल्याने जखमी झाली. तर १४ मे रोजी सय्यद सलमा सय्यद सलीम (वय ३०, रा. गेवराई) ही महिला सारवाडी ते कोडी दरम्यान, रेल्वेतून पडल्याने जखमी झाली. जखमींवर उपचार सुरू आहेत. (वार्ताहर) फेरोजखानने युवकास बचावले १७ मे रोजी रात्री १२.१० वाजता जालना स्थानकावर मनमाडहून सिकंदराबादकडे जाणारी अजिंठा एक्स्प्रेस आली. २० वर्षीय एक तरूण आपल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी तेथे आला होता. नातेवाईकांस रेल्वेत बसविल्यानंतर रेल्वे सुरू झाल्याने हा युवक घाईघाईने उतरण्यासाठी रेल्वेच्या दारापर्यंत आला. त्याचवेळी त्याचा एक पाय पायर्यांमध्ये अडकल्याने एका हाताने रेल्वेच्या लोखंडी दांडीला पकडलेला हा युवक खाली घसरला. मात्र त्याचवेळी प्लॅटफार्मवर असलेले फेरोजखान अब्बासखान पठाण (रा. कुच्चरओटा, जुना जालना) यांनी लगेच सदर तरूणाला दोन्ही हातांनी ओढून बाजूला केले. त्यामुळे सदर तरूणाचे प्राण वाचले. स्थानकावरील अनेकांनी फेरोजखान यांच्या या धाडसी कामगिरीचे कौतुक केले. तीन मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही या तीन महिन्यांच्या काळात झालेल्या दहा अपघातांमधील तीन मृतांची ओळख अद्यापही पटलेली नाही. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. मात्र ओळख पटविण्यासाठी कोणीही जालना लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधलेला नाही, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.