६४ गावांना टंचाईचा विळखा !
By Admin | Updated: December 19, 2015 23:50 IST2015-12-19T23:37:08+5:302015-12-19T23:50:03+5:30
रमेश शिंदे , औसा यंदाच्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे तालुक्यातील ६४ गावांना हिवाळ्यातच पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.

६४ गावांना टंचाईचा विळखा !
रमेश शिंदे , औसा
यंदाच्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे तालुक्यातील ६४ गावांना हिवाळ्यातच पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पाच गावांना टँकरद्वारे तर २० गावांना २५ अधिग्रहणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. १३ प्रस्ताव मंडळ अधिकाऱ्यांकडे तर १३ प्रस्ताव क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे पाहणीसाठी पाठविण्यात आले आहेत. टंचाईमुळे नागरिकांचा जीव व्याकूळ झाला आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून औसा तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे पाणीपातळीत झपाट्याने घट झाली आहे. गेल्यावर्षी १६५ अधिग्रहणांद्वारे आणि पाच टँकरच्या माध्यमातून तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. यंदा तर त्यापेक्षाही कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे.
डिसेंबरमध्येच तालुक्यातील काही गावांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. सध्या कार्ला, टाका, तांबरवाडी, नागरसोगा, चिंचोली सोन या पाच गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर आलमला, मासुर्डी, शिवणी लख व शिवणी लख वाडी-तांडा या गावांनी चार टँकरची मागणी केली आहे.
तालुक्यातील वांगजी, कोरंगळा, एकंबी, बोरफळ, सिंदाळा (लो.), अपचुंदा, बेलकुंड, कवळी, बऱ्हाणपूर, यल्लोरीवाडी, किनीनवरे, जावळी, तुंगी (बु.), जमालपूर, किनीथोट, वरवडा, कन्हेरी, मासुर्डी, जयनगर, सारोळा यासह ६४ गावांनी अधिग्रहणांद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. सध्या २५ अधिग्रहणांना मंजुरी देण्यात आली आहे.
तालुक्यात दिवसेंदिवस पाणीटंचाईची समस्या गंभीर बनत आहे. त्यामुळे पाणी विक्रीचा व्यवसायही वाढला असल्याचे पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागात अबालवृद्ध पाण्यासाठी भटकंती करीत असल्याचे पहावयास मिळत आहे.