जिल्ह्यातील ६२ वाळूपट्टे वाऱ्यावर !
By Admin | Updated: January 29, 2015 01:14 IST2015-01-29T01:04:03+5:302015-01-29T01:14:24+5:30
संजय कुलकर्णी ,जालना जिल्ह्यातील सर्वच ६२ वाळूपट्टे सध्या अवैध उपशाचे अड्डे बनले आहेत. दररोज या पट्टयांवरून रात्रीच्या वेळी लाखो रुपयांच्या वाळूची चोरटी वाहतूक केली जात आहे

जिल्ह्यातील ६२ वाळूपट्टे वाऱ्यावर !
संजय कुलकर्णी ,जालना
जिल्ह्यातील सर्वच ६२ वाळूपट्टे सध्या अवैध उपशाचे अड्डे बनले आहेत. दररोज या पट्टयांवरून रात्रीच्या वेळी लाखो रुपयांच्या वाळूची चोरटी वाहतूक केली जात आहे. काही ठिकाणी कारवाई केली जात असली तरी ती तात्पुरतीच असते. अधिकाऱ्यांच्या अशा दूर्लक्षामुळे हे वाळूपट्टे वाऱ्यावरच आहेत.
भोकरदन, जाफराबाद, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा, बदनापूर आणि जालना या आठही तालुक्यांमध्ये सर्रासपणे वाळूचा अवैध उपसा सुरू आहे. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी बुधवारी जालन्यात या प्रश्नावरुन अधिकाऱ्यांचे कान टोचले. या पार्श्वभूमीवर जिल्हाभरातील वाळू पट्ट्यांचा आढावा घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली. सप्टेंबर २०१४ला आधीचे लिलाव संपुष्टात आले. नंतर उपशाला बंदी असल्याने लिलाव झाले नाहीत. मात्र, वाळू उपसा काही थांबला नाही. भोकरदन, घनसावंगी, अंबड आणि बदनापूर तालुक्यात काही पट्टयांवर तर भर दिवसा हा अवैध उपसा सुरू आहे. त्याचप्रमाणे मंठा, परतूर, जालना व जाफराबाद या तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाळूचे अवैध उत्खनन होत आहे. आरटीओ, महामार्ग पोलीस, संबंधित ठाण्याचे पोलीस, महसूल प्रशासन या यंत्रणेने संयुक्त मोहीम फार कमी वेळा राबविलेली आहे. त्यामुळे या माफियांचे फावते आहे.
वाळू माफियांकडून पाळत
ट्रॅक्टर ट्रॉली, टिप्पर, ट्रक या वाहनांद्वारे होते. बहुतांश ठिकाणी सायंकाळी सातनंतर वाळू माफियांचा अवैध उपशाचा हा गोरख धंदा सुरू होतो. या माफियांची माणसे त्या-त्या विभागातील अधिकाऱ्यांच्या पाळतीवरच असतात. अधिकाऱ्यांचे ‘लोकेशन’ त्यांना माहिती असते. एखाद्या तालुक्यात कठोर, कार्यतत्पर अधिकारी असेल, आणि त्यांनी छाप्यासाठी सापळा रचला असेल तर त्याची माहिती अगोदरच माफियांना कळते. हा प्रकार सर्वच ठिकाणी होतो, असेही नाही. मात्र जेथे सापळा यशस्वी होतो, अशा ठिकाणी अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जातात, मारहाण केली जाते, हे भोकरदन, जाफराबाद तालुक्यातील काही घटनांवरून स्पष्ट झालेले आहे.
जालन्याचे तहसीलदार रेवननाथ लबडे म्हणाले की, आॅक्टोबर २०१४ पासून आजपर्यंत वाळू उपशाला शासनाने परवानगी दिलेली नाही. परंतु या काळात जालना तालुक्यात अवैध उपशा करणारी ५७ वाहने आमच्या पथकांनी पकडली व त्यांच्याकडून १० लाखांचा दंड वसूल केला.
४भोकरदनचे तहसीलदार अविशकुमार सोनवणे म्हणाले, गेल्या चार महिन्यांपासून तालुक्यात एकाही वाळूूपट्टयाचा लिलाव झाला नाही. त्यामुळे महसुलात घट झाली. परंतु या दरम्यान ज्या ठिकाणी वाळूचा अवैध उपसा उघडकीस आला तेथे एकूण आठ लाखांचा वाळूसाठा जप्त केला. काही जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले.
तालुक्यात पूर्णा, गिरजा, केळणा पात्रात वालसा, केदारखेडा, जवखेडा ठोंबरी, नळणी, तडेगाव, हसनाबाद, बोरगाव तारू, बोरगाव खडक, कोदोली, बामखेडा, गव्हाण संगमेश्वरमधून होतेय वाळू वाहतूक.
तालुक्यात पूर्णा, धामणा आणि केळणा या नदीपात्रांतील टाकळी, सावंगी, जाफराबाद, जवखेडा ठेंग, बोरगाव, पिंपळखुटा या पट्टयांमधून होतोय अवैध वाळू उपसा.
अंबड
तालुक्यात बळेगाव, आपेगाव, साष्टपिंपळगाव, गोरी, गंधारी, डोमलगाव, शहागड, वाळकेश्वर, कुरण, हिंगणगाव, गोंदी, हसनापूर या पट्टयांवरून सायंकाळनंतर अवैध उपसा केला जात आहे.
घनसावंगी
तालुक्यात बऱ्याच ठिकाणी दिवसाच चोरटी वाहतूक सुरू आहे. भादली, कोठी, शिवनगाव, राजाटाकळी, मंगरूळ, गुंज, बानेगाव, भोगगाव, रामसगाव या पट्टयांवर वाळूचा अवैध उपसा होत आहे.