५०० कोटींचा ‘व्हॅट’ शहरातून

By Admin | Updated: June 14, 2014 01:20 IST2014-06-14T01:19:29+5:302014-06-14T01:20:18+5:30

औरंगाबाद - शहरातून ५०० कोटी रुपयांचा मूल्यवर्धित कर (व्हॅट) संकलित होतो. त्यावर १० टक्के सरचार्ज लावला, तर ५० कोटी रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळेल.

500 crores 'VAT' from the city | ५०० कोटींचा ‘व्हॅट’ शहरातून

५०० कोटींचा ‘व्हॅट’ शहरातून

औरंगाबाद - शहरातून ५०० कोटी रुपयांचा मूल्यवर्धित कर (व्हॅट) संकलित होतो. त्यावर १० टक्के सरचार्ज लावला, तर ५० कोटी रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळेल. ते उत्पन्न एलबीटीच्या तुलनेत फक्त २५ टक्के असल्यामुळे मनपासमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे. एलबीटी, जकात असो किंवा नसो २०० कोटी रुपयांचे उत्पन्न पालिकेला सध्या हवे आहे. तेवढे उत्पन्न मिळाले तर मनपाचे अर्थचक्र सुरळीत चालेल.
शहराची इकॉनॉमी ट्रेडिंग (व्यापार) वर आहे. मॅन्युफॅक्चरिंग वाळूज, शेंद्रा औद्योगिक वसाहतींमध्ये होत असल्याने त्याचा फायदा शहराला मिळत नाही. जिल्ह्यातून १८०० कोटींचे उत्पन्न व्हॅटमधून मिळते.
व्यापाऱ्यांनी एलबीटी आणि जकात या दोन्ही करसंकलन व्यवस्थांना विरोध केला आहे. त्यामुळे सेल्स टॅक्ससोबतच एलबीटी भरण्याची व्यवस्था करून दिल्यास व्यापाऱ्यांची पालिकेच्या जाचातून सुटका होईल. हा पर्यायी मार्ग काढण्याबाबत शासनस्तरावर विचार सुरू आहे. मनपाचे सुमारे २० कोटी रुपयांचे एलबीटीतून मिळणारे उत्पन्न महिन्यापासून घटले आहे.
आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सत्ताधाऱ्यांनी तर अजून एलबीटी, जकात, सेल्स टॅक्सपैकी कोणत्याही पर्यायाबाबत व्यापाऱ्यांशी चर्चा केलेली नाही. मात्र आघाडीचे माजी विरोधी पक्षनेते प्रमोद राठोड, डॉ.जफरखान यांनी मुख्यमंत्र्यांकडे एलबीटीबाबत तोडगा काढण्याची मागणी केली आहे.
मनपाच्या व शहराच्या विकासाचा प्रश्न आहे, त्यामुळे या प्रकरणात तातडीने निर्णय घेण्याची त्यांनी मागणी केली आहे.
मुद्रांक शुल्कात वाढ केल्यास
मुद्रांक शुल्कातून १ टक्का म्हणजेच १० कोटींचे उत्पन्न मनपाला मिळते. सध्या वास्तू खरेदीखतावर ६ टक्के मुद्रांक शुल्क लावले जाते. त्यामध्ये ४ ते ५ टक्के वाढ केल्यास ५० कोटींचे अतिरिक्त उत्पन्न मिळेल.
सरचार्ज आणि मुद्रांक शुल्क असे मिळून १०० कोटी मनपाला मिळतील. तरीही मनपाला १०० कोटी रुपयांचे उत्पन्न कमी पडते; पण मुद्रांक शुल्कात वाढ केल्यास शहरात घरांच्या किमती वाढतील. नागरिकांवर त्याचा बोजा पडू शकतो. त्यामुळे हा पर्याय देखील गुलदस्त्यात गेला आहे.
३५० कोटींचे समीकरण
एलबीटीतून २०० कोटी, मालमत्ताकर व पाणीपट्टीतून १०० कोटी, ट्रान्झिटकरातून १८ कोटी, नगररचना व मालमत्ता किरायातून ३२ कोटी असे ३५० कोटी रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळते. एलबीटी बंद करून सरचार्ज व मुद्रांक शुल्कातून फक्त १०० कोटी मिळतील. २५० कोटींत मनपाचा कारभार चालणे शक्य नाही.

Web Title: 500 crores 'VAT' from the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.