जिल्ह्यातील ५० टक्के पाझर तलाव गळके !

By Admin | Updated: June 19, 2014 00:21 IST2014-06-18T23:54:42+5:302014-06-19T00:21:27+5:30

बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद सिंचन क्षमता वाढावी आणि तलावाच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या गावातील ग्रामस्थांची तहान भागविली जावी या उद्देशाने जिल्हाभरात तब्बल सव्वापाचशे प्रकल्प उभारण्यात आले

50 percent percolation lake leak in the district! | जिल्ह्यातील ५० टक्के पाझर तलाव गळके !

जिल्ह्यातील ५० टक्के पाझर तलाव गळके !

बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद
सिंचन क्षमता वाढावी आणि तलावाच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या गावातील ग्रामस्थांची तहान भागविली जावी या उद्देशाने जिल्हाभरात तब्बल सव्वापाचशे प्रकल्प उभारण्यात आले. आजघडीला जिल्ह्यामध्ये अशा स्वरुपाचे तलाव उभारणीसाठी ‘पॉर्इंट’ ही शिल्लक नाहीत. असे असतानाच दुसरीकडे २३१ तलाव दुरुस्तीला आले आहेत. आजघडीला हे तलाव केवळ नावालाच उरले आहेत. पावसाचे पाणी आले तसे वाहून जात आहे. याचा विस्तृत अहवाल जि.प. ‘लपा’ विभागाने तयार करुन जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडे सादर केला आहे. यासाठी किमान २१ कोटी रुपये आवश्यक आहेत.
जिल्ह्यामध्ये मागील तीन दशकामध्ये साठवण तलावांची मोठ्या प्रमाणात कामे झाली. विशेषत: १९७२ ते ७५ या कालावधीत सर्वाधिक कामे झाल्याचे नजरेस पडते. मात्र यातील अनेक तलावाच्या जलरोधक खंदकाची कामे तांत्रिकदृष्ट्या बरोबर झालेली नव्हती. त्यामुळे हे तलाव जरी सुस्थितीत असले तरी भरावाखालून पाणी वाहून जात आहे. तसेच अनेक तलावांचे सांडवे खराब झाले आहेत. भराव खचले आहेत. काही तलाव पावसामुळे फुटल्याने पूर्ण क्षमतेने भरले जात नाहीत. परिणामी ज्या उद्देशाने हे तलाव उभारण्यात आले होते तो उद्देश कुठेही साध्य होताना दिसत नाही. आजघडीला तलाव क्षेत्रांतर्गत येणाऱ्याना गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर ओढावली आहे. ही एक प्रकारे शोकांतिकाच म्हणावी लागेल.
मागील ३४ वर्षामध्ये जिल्ह्यात सुमारे सव्वापाचशे पाझर तलाव बांधण्यात आले. यापैकी ५० टक्के तलाव हे निरुपयोगी बनले आहेत. पावसाचे पाणी साचत नसल्याने पाणीटंचाईसोबतच सिंचनाचा प्रश्नही निर्माण होत आहे. जिल्हा लघु पाटबंधारे विभागाने तयार केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. उस्मानाबाद तालुक्यात १२६ तलाव आहेत. त्यापैकी ५२ तलाव नादुरुस्त झाले आहेत. या तलावाच्या दुरुस्तीसाठी जवळपास पावणेतीन कोटी रुपये आवश्यक आहेत. तुळजापूर तालुक्यातील ९२ पैकी ४६ तलाव दुरुस्तीला आले आहेत. या तलावाच्या दुरुस्तीसाठी जवळपास पावणेचार कोटी रुपये अपेक्षित आहेत. कळंब तालुक्यातीलही ४३ तलाव दुरुस्त करावे लागणार आहेत. त्यासाठी किमान साडेचार कोटी रुपये आवश्यक आहेत. परंडा तालुक्यातील ५० टक्के म्हणजेच २७ तलावांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. यासाठी पावणेतीन कोटी रुपये लागणार आहेत. हीच अवस्था भूम तालुक्यातही आहे. भूम तालुक्यासाठीही जवळपास ४ कोटी रुपये लागणार आहेत. ४० तलाव नादुरुस्त आहेत. वाशी तालुक्यातील १० प्रकल्पांसाठी जवळपास १ कोटी रुपये आवश्यक आहेत. उमरगा तालुक्यातील सहा प्रकल्पांसाठी ४३ तर लोहारा तालुक्यातील ७ प्रकल्पांसाठी जवळपास अर्धा कोटी रुपये लागणार आहेत. एकूण तलावांचा विचार केला असता, २३१ तलाव दुरुस्त केल्याशिवाय गत्यंतर नाही.
लोकप्रतिनिधींची उदासिनता
तलाव सुस्थितीत असतील तर पाणी टंचार्ई निवारणावर खर्च होणारे कोट्यवधी रुपये वाचू शकतात. तसेच सिंचनाखालील क्षेत्रात वाढ होऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होते. याच उद्देशाने हे तलाव उभारण्यात आले. प्रत्यक्षात तलाव बांधण्यात आले असले तरी त्याच्या दुरुस्तीकडे सपशेल कानाडोळा केला. त्यामुळे आजघडीला पावसाचे पाणी आले तसे वाहून जात आहे. ना सिंचनासाठी ना टंचाई निवारणासाठी याचा उपयोग होतो. असे असतानाही जिल्हा नियोजन समिती वा अन्य हेडमधून अत्यंत तुटपुंजा निधी या प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी दिला जात आहे. मागील वर्षी ५ लाख आणि यंदा २५ लाख रुपये दिले आहेत. त्यामुळे तलाव उभारणीवर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही केवळ दुरुस्त्याअभावी हा खर्च पाण्यात जात आहे.
नादुरुस्त तलाव
तालुका संख्या
उस्मानाबाद ५२
तुळजापूर ४६
कळंब ४३
परंडा २७
भूम ४०
वाशी १०
उमरगा ०६
लोहारा ०७
एकूण २३१

Web Title: 50 percent percolation lake leak in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.