धरपकड मोहिमेत ५० जण ताब्यात
By Admin | Updated: June 10, 2014 00:59 IST2014-06-10T00:40:45+5:302014-06-10T00:59:24+5:30
औरंगाबाद : आगामी विधानसभा आणि महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महापुरुष तसेच देवदेवतांची विटंबना करण्याचा हा काही जणांचा पूर्वनियोजित कट असल्याचा अंदाज पोलीस सूत्रांनी वर्तविला आहे.

धरपकड मोहिमेत ५० जण ताब्यात
औरंगाबाद : आगामी विधानसभा आणि महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महापुरुष तसेच देवदेवतांची विटंबना करण्याचा हा काही जणांचा पूर्वनियोजित कट असल्याचा अंदाज पोलीस सूत्रांनी वर्तविला आहे.
फेसबुक, व्हॉटस्अप, टिष्ट्वटर, यू-ट्यूब यासारख्या सोशल मीडियाबाबत आता नागरिक जागरूक झाले आहेत. कायदा व सुव्यवस्था बिघडवून शहरातील शांततेला गालबोट लावण्याचे समाजकंटकांचे षड्यंत्र नागरिक ओळखून आहेत. परिणामी, आपले ईप्सित साध्य करण्यासाठी आगामी काळात सोशल मीडियाशिवाय अन्य कोणत्या तरी दुसऱ्या माध्यमातून विटंबनेची मोठी घटना करून शहरात जातीय तणाव निर्माण केला जाऊ शकतो. त्यादृष्टीने शहरात पोलीस यंत्रणा अलर्ट करण्यात आली आहे. सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी आपल्या हद्दीतील सर्व पक्ष-संघटनांचे कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिकांची बैठक घेऊन शांतता अबाधित ठेवण्याचे आवाहन करीत आहेत.
समाजकंटकांचे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी नागरिकांना शहरात संयम राखण्याचे आवाहन केले आहे. इंटरनेटवरून विटंबनेचे प्रकार केले जात आहेत. त्याचे मूळ शोधणे अवघड असले तरी समाजकंटकांचा हेतू काय आहे, तो आपण ओळखला पाहिजे. प्रतिक्रिया व्यक्त करण्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष करणेच समाजहितासाठी योग्य राहील, असे ते म्हणाले.
फेसबुकवर महापुरुषांचे बदनामीकारक चित्र व मजकूर प्रसारित केल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून शहरात दगडफेक व बळजबरीने दुकाने बंद करण्याचे प्रयत्न झाले. शहरातील अनेक भागांत पोलिसांनी शनिवारी रात्रीपासून बंदोबस्त लावला होता.
सलग दोन दिवस पोलिसांनी खडा पहारा देऊन गडबड करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पाळत ठेवली. तरीही काल रविवारी दिवसभर विविध भागांत कार्यकर्ते रस्त्यावर येऊन घोषणाबाजी करीत होते. संपूर्ण शहरात अफवांचे पेव फुटले होते. काल रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास पंचवटी चौकात वाहनांवर दगडफेकही झाली. पोलिसांनी विविध भागांतून गोंधळ घालणाऱ्या ५० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
फेसबुकवर महापुरुषांची विटंबना केल्याच्या निषेधार्थ शहर व परिसरातील वातावरण बिघडविणाऱ्या ५० पेक्षा जास्त तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी दिली.
दरम्यान, आज सोमवारी छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जांभाळा येथील एक घटना वगळता शहरात सर्वत्र शांतता होती. जांभाळा येथे काही स्थानिक कार्यकर्त्यांनी आठवडी बाजार उधळून लावला. गावातील दुकाने बळजबरीने बंद केली.
या प्रकरणी छावणी पोलिसांनी घटनास्थळी वेळीच पोहोचून ७ कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई केली.