४४ निमशिक्षकांची फरफट सुरूच !
By Admin | Updated: September 3, 2014 01:06 IST2014-09-03T01:06:09+5:302014-09-03T01:06:09+5:30
उस्मानाबाद : परंडा तालुक्यामध्ये नियमित पदमान्यतेच्या २३ जागा रिक्त असून नव्याने सुरू करण्यात आलेले पाचवी व आठवीच्या वर्गावर २२ शिक्षकांची गरज आहे.

४४ निमशिक्षकांची फरफट सुरूच !
उस्मानाबाद : परंडा तालुक्यामध्ये नियमित पदमान्यतेच्या २३ जागा रिक्त असून नव्याने सुरू करण्यात आलेले पाचवी व आठवीच्या वर्गावर २२ शिक्षकांची गरज आहे. असे असताना जिल्हा परिषदेकडून मात्र, संबंधित ४४ निमशिक्षकांना नियुक्त्या दिल्या जात नसल्याने निमशिक्षकांची फरफट सुरूच आहे.
शासनाच्या आदेशानंतर जिल्हाभरातील ८० ते८२ निमशिक्षकांचे रिक्त जागेवर समायोजन करण्यात आले. असे असले तरी आणखी ४४ निमशिक्षकांचे समायोजन करणे बाकी आहे. एकीकडे रिक्त जागा नाहीत, असे सांगितले जात आहे. वारंवार चकरा मारूनही न्याय मिळत नसल्याने संबंधित निमशिक्षकांनी मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे आणि शिवसेनेचे सदस्य दत्तात्रय साळुंके यांच्याकडे धाव घेतली. यावेळी अनेकांनी त्यांची व्यथा मांडली. त्यानंतर साळुंके यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांची भेट घेवून या प्रश्नाबाबत चर्चा केली. तालुक्यामध्ये नव्याने पाचवी व आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. परंतु, अनेक ठिकाणी शिक्षकच नाहीत. त्यामुळे या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. तसेच नियमित पदमान्यतेच्याही २३ जागा रिक्त आहेत. त्यामुळे सदरील निमशिक्षकांना या ठिकाणी नियुक्त्या द्याव्यात, अशी मागणी सीईओंकडे केली. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा, स्थायी समितीची बैठक, शिक्षण समितीमध्ये शिक्षकांच्या रिक्त जागांचा प्रश्न वेळोवेळी उपस्थित केला जात आहे. परंतु, जिल्हा परिषदेकडून परंडा तालुक्यावर सातत्याने अन्याय केला जात आहे. वारंवार मागणी करूनही ती गांभीर्याने घेतली जात नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. तालुक्यातील विविध शाळांमध्ये जवळपास ४५ शिक्षकांची गरज आहे. निमशिक्षकही अतिरिक्त आहेत. असे असतानाही जिल्हा परिषदेकडून निमशिक्षकांच्या समयोजनाबाबत चालढकल का केली जाते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हा प्रश्न तातडीने मार्गी लावा, अन्यथा जिल्हा परिषदेत शाळा भरवू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. सदरील निवेदन त्यांनी अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे यांनाही दिले आहे.