वर्षभरात ४३ अर्भक रस्त्यावर
By Admin | Updated: December 15, 2014 00:50 IST2014-12-14T00:56:00+5:302014-12-15T00:50:30+5:30
औरंगाबाद ; जन्मदाते जिवंत असूनही मागील वर्षभरात ४३ बाळांना अनाथ म्हणून जगावे लागत आहे.

वर्षभरात ४३ अर्भक रस्त्यावर
औरंगाबाद ; जन्मदाते जिवंत असूनही मागील वर्षभरात ४३ बाळांना अनाथ म्हणून जगावे लागत आहे. त्या अभागी मातेच्या पोटी जन्म घेतला यात त्या बालकांचा काय दोष; पण आई असूनही तिच्या दुधाला ही बालके आज मुकली आहेत. एवढा निष्ठुरपणा, की बाळाला कचराकुंडी, रस्त्यावर, शेतात, घाटीत बेवारस अवस्थेत टाकून १८ मातांनी पळ काढला, तर २५ मातांनी आपली जबाबदारी झटकत पोटच्या गोळ्याला शासनाच्या पदरात टाकून दिले.
अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या बाळांना टाकून दिल्याच्या या घटना कोणत्या मेट्रो सिटीत नव्हे, तर औरंगाबाद जिल्ह्यात घडल्या आहेत. आणखी धक्कादायक बाब म्हणजे वर्षभरात १५ मुलींवर विवाहापूर्वीच मातृत्व लादले गेले आहे. पण पोलिसात तक्रार नसल्याने आजही दोषी उजळ माथ्याने समाजात वावरत आहेत.
शालेय मुलगी, तरुणी, महिला मग ती शहरातच काय ग्रामीण भागातही सुरक्षित नाही हे या घटनांवरून प्रखरतेने जाणवत आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून किंवा लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याच्या काही घटनाच समोर येतात; पण कुटुंबाच्या इज्जतीपायी अनेक प्रकरणे दाबली जात आहेत. गर्भधारणा झाल्यावर ‘तो मी नव्हेच’ असे प्रियकराने हात झिडकारेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. जन्म दिल्यानंतर आईने बाळाला कमीत कमी ६ महिने तरी दूध पाजणे गरजेचे असते; पण कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने नवजात अर्भकांना टाकून दिले जात आहे. मागील वर्षभरात जिल्ह्यात विविध ठिकाणी १८ बालके बेवारस अवस्थेत टाकून दिलेली पोलिसांना आढळून आली.