औरंगाबादेत ३९३ दिवसांत कोरोना रुग्णसंख्या पोहोचली १ लाख १८४, एकूण कोरोना बळी २००४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:04 IST2021-04-13T04:04:31+5:302021-04-13T04:04:31+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने सोमवारी एक लाखाचा टप्पा पार केला. अवघ्या ३९३ दिवसांत जिल्ह्यातील कोरोना ...

औरंगाबादेत ३९३ दिवसांत कोरोना रुग्णसंख्या पोहोचली १ लाख १८४, एकूण कोरोना बळी २००४
औरंगाबाद : जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने सोमवारी एक लाखाचा टप्पा पार केला. अवघ्या ३९३ दिवसांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या १ लाख १८४ झाली, तर कोरोना बळींची संख्याही २००४ झाली. धक्कादायक म्हणजे ११ महिन्यांत जेवढ्या कोरोना रुग्णांचे निदान झाले, तेवढ्या म्हणजे ५० हजार रुग्णांची गेल्या दीड महिन्यातच भर पडली. दुर्दैवाने गेल्या ४४ दिवसांत तब्बल ७३८ नागरिकांचा बळी गेला. कोरोनाच्या या भयंकर परिस्थितीने आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हानही कैकपटीने वाढले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात १५ मार्च २०२० रोजी पहिल्या कोरोना रुग्णाचे निदान झाले होते, तर ५ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला बळी गेला होता. पहिल्या लाटेत कोरोना रुग्णसंख्येत संथ स्वरूपात वाढ झाली आणि ऑक्टोबरनंतर कमीदेखील होत गेली. जानेवारीअखेर रुग्णसंख्येचा आलेख घसरता होता; परंतु फेब्रुवारी महिना उजाडला आणि कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले. अक्षरश: हाहाकार सुरू केला. दररोज निदान होणाऱ्या रुग्णांच्या संख्येने चार आकडी संख्या गाठली. रोज २० ते ३० रुग्णांचा मृत्यू होत आहे. ही सगळी परिस्थिती टाळण्यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, अन्यथा कोरोनाची ही रुग्णसंख्यादेखील दुप्पट होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
----
२७ फेब्रुवारी रोजी होती रुग्णसंख्या ५०,११०, मृत्यू १२६६; परंतु दीडच महिन्यात कोरोना रुग्णसंख्येने लाखाचा टप्पा पार केला, तर मृत्यूनेही २ हजारांचा आकडा ओलांडला.
-------
१४ मार्चपासून रोज एक हजारावर रुग्ण
जिल्ह्यात मार्चमध्ये कोरोनाने अक्षरश: कहर केला. रोज २०० ते ४०० च्या घरात नव्या रुग्णांचे निदान होत असे. मात्र, १४ मार्चपासून रोज १ हजारावर कोरोना रुग्णांचे निदान होण्यास सुरुवात झाली. ही संख्या अनेकदा पंधराशेवर गेली, तर १० एप्रिल रोजी उच्चांकी १९६४ रुग्णांचे निदान झाले. त्याबरोबर रोज मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात ३० मार्च रोजी २४ तासांत तब्बल ४३ रुग्णांचा बळी गेला.
----------
त्रिसूत्रीचे पालन करावे
आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान निश्चितच वाढले आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचे पालन केले पाहिजे. या बाबी पुढील एक ते दोन वर्षे तरी किमान पाळाव्या लागतील. लसीकरणाचाही खूप मोठा टप्पा गाठणे बाकी आहे. तोपर्यंत गर्दी टाळण्यावर भर दिला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी थुंकता कामा नये.
-डाॅ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक
----
जिल्ह्यातील १४ महिन्यांतील कोरोनाची परिस्थिती
महिना- रुग्ण - मृत्यू
मार्च २०२०-------१- ०
एप्रिल २०२० ---१७९- ७
मे २०२०------ १३६४ - ६६
जून २०२०-----४१२९ - १८५
जुलै २०२०---६९००- २१८
ऑगस्ट २०२०---११,१६२- २१६
सप्टेंबर २०२०------१०९५९- २४६
ऑक्टोबर २०२०------५६६८- १४४
नोव्हेंबर २०२०-----२९९३ - ६७
डिसेंबर २०२०-----२२४९ -- ५६
जानेवारी २०२१-----१३८३- ३३
फेब्रुवारी २०२१-----३३७९ ३०
मार्च २०२१----३२,३१३- ४०२
एप्रिल २०२१---१७,५०५ ३३४
-----------