साडेआठशे कारवायांत ३६ कोटींंचा मुद्देमाल वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:38 IST2017-09-08T00:38:07+5:302017-09-08T00:38:07+5:30
अवैध धंदेवाल्यांसाठी पोलीस अधीक्षकांची दोन विशेष पथके कर्दनकाळ ठरल्याचे समोर आले आहे. अवघ्या सहा महिन्यांत या पथकाने साडेआठशे कारवाया करुन हजारो आरोपींना जेरबंद केले.

साडेआठशे कारवायांत ३६ कोटींंचा मुद्देमाल वसूल
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अवैध धंदेवाल्यांसाठी पोलीस अधीक्षकांची दोन विशेष पथके कर्दनकाळ ठरल्याचे समोर आले आहे. अवघ्या सहा महिन्यांत या पथकाने साडेआठशे कारवाया करुन हजारो आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याकडून तब्बल ३६ कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मागील अनेक वर्षांचे रेकॉर्ड या पथकाने मोडले आहे.
सहा महिन्यांपूर्वी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पोलीस उपनिरीक्षक कैलास लहाने व अडीच महिन्यांपूर्वी सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके स्थापन केली. प्रचंड खबरी अन् माहितीच्या प्रबळ स्रोताआधारे या दोन्ही पथकांनी जिल्ह्यात फिरून जुगारी, अवैध वाळू वाहतूक, मटका बहाद्दर, दारू विक्रेते आदींवर कारवाईचा बडगा उगारला. तसेच त्यांच्याकडून मुद्देमालही हस्तगत केला. लहाने यांच्या पथकात गणेश पवार, पी.टी. चव्हाण, संजय चव्हाण, अनंत गिरी, शिवदास घोलप, जयराम उबे, तर चव्हाण यांच्या पथकात शरद कदम, विकास वाघमारे, राहुल शिंदे, विठ्ठल देशमुख यांचा समावेश आहे. या सर्व कारवाया पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.
चव्हाण यांची बदली;
गुरव यांच्याकडे सूत्रे
संजय चव्हाण यांची मुंबई एसआयटीला बदली झाली आहे. त्यामुळे हे पथक १५ आॅगस्ट बंद केले होते. परंतु, शुक्रवारपासून पुन्हा हे पथक कार्यरत होत आहे. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षिका अनुराधा गुरव यांच्याकडे पथकाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे..