वर्षात वाहनधारकांकडून ३५ लाखांचा दंड वसूल

By Admin | Updated: December 20, 2014 23:34 IST2014-12-20T23:34:10+5:302014-12-20T23:34:10+5:30

बीड : वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होते़ त्यामुळे त्यांच्यावर वाहतूक पोलीस नेहमीच कारवाई करतात़ वर्षभराच्या कालावधित वाहतूक

35 lacs of recovering from vehicle owners in the year | वर्षात वाहनधारकांकडून ३५ लाखांचा दंड वसूल

वर्षात वाहनधारकांकडून ३५ लाखांचा दंड वसूल


बीड : वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होते़ त्यामुळे त्यांच्यावर वाहतूक पोलीस नेहमीच कारवाई करतात़ वर्षभराच्या कालावधित वाहतूक पोलिसांनी १९ हजार ८५२ वाहनधारकांवर कारवाई करीत तब्बल ३५ लाख ९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे़
जिल्ह्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ त्यांना धाक रहावा म्हणून वाहतूक पोलीस नेहमीच त्यांच्यावर कारवाई करीत दंड ठोठावत असतात़ त्यामध्ये दारू पिऊन वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, विरूध्द दिशेने येणे, चौकामध्ये वाहन उभे करणे, परवाना नसणे, अवैध प्रवासी वाहतूक, ट्रिपल सीट गाडी चालविणे, वाहनाची कागदपत्रे न बाळगणे, चालत्या वाहनावरून मोबाईलवर बोलणे, रहदारीस अडथळा यासह अनेक बाबींचा समावेश आहे़ वाहतूक पोलिसांच्या वतीने मांजरसुंबा ते गेवराई महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहनचालकाची तपासणी करण्यात आली़ तो मद्य पिऊन वाहन चालवित असल्याचे समोर आल्यास त्याला ताब्यात घेऊन संबंधित पोलीस ठाण्यांतर्गत न्यायालयात दाखल करण्यात येते़ त्यानंतर त्याला दंड ठोठावण्यात येतो़ यासह सिग्नल तोडून पळून जाणारे किंवा विना परवाना वाहन चालविणाऱ्यांना वाहतूक पोलीस पावती फाडून दंड वसूल करतात़ वर्षभराच्या कालावधीत ३५ लाख ९ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ हा आकडा नोव्हेंबरअखेरचा असल्याची माहिती पोलिस प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे़ गेल्या वर्षी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करीत ३२ लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आला होता़ यात यावर्षी ३ लाख रूपयांची वाढ झाली आहे़ वारंवार कारवाया होत असल्याने वाहनधारकांनी धसका घेतला आहे़ परंतु कळत नकळत वाहतूक नियमांचे उल्लंघन होतच असते़ दंड देऊनही नियमांचे उल्लंघन होत आहे़
अधीक्षकांनी दिल्या सूचना
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी केल्या आहेत़ तसेच कारवाई करताना कोणी अडथळा निर्माण करत असल्यास त्याच्यावरही कारवाई करावी, असेही त्यांनी वाहतूक पोलिसांना सांगितले आहे़ वाहन पकडल्यानंतर संबंधित व्यक्ती नेते मंडळींना फोन लावतात़ त्यामुळे वाहतूक पोलिसांवर दबाव निर्माण होतो़ त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई तर कराच, अडथळा आणणाऱ्यावरही कारवाई करण्याचे सांगितले आहे़ (प्रतिनिधी)४
२०१३ या वर्षांमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७ हजार ५६० वाहनांधारकांवर कारवाया करण्यात आल्या़
४त्यांच्याकडून ३२ लाख ३७ हजार ७०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला होता़
४नोव्हेंबर २०१४ पर्यंत जिल्ह्यात १९ हजार ८५२ वाहनधारकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ३५ लाख ९ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़

Web Title: 35 lacs of recovering from vehicle owners in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.