जिल्ह्यात कला शाखेच्या ३५ टक्के जागा राहणार रिक्त
By Admin | Updated: June 18, 2016 00:56 IST2016-06-18T00:46:58+5:302016-06-18T00:56:55+5:30
लातूर : दहावीत विशेष प्राविण्य आणि प्रथम श्रेणीत आलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी विज्ञान, वाणिज्य, तंत्रनिकेतन, औद्यौगिक विकास अभ्यासक्रम,

जिल्ह्यात कला शाखेच्या ३५ टक्के जागा राहणार रिक्त
लातूर : दहावीत विशेष प्राविण्य आणि प्रथम श्रेणीत आलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी विज्ञान, वाणिज्य, तंत्रनिकेतन, औद्यौगिक विकास अभ्यासक्रम, कृषी पदविका अशा अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याच्या तयारीत आहेत़ परिणामी कला शाखेचे ६५ टक्के विद्यार्थीच प्रवेश घेणार असून, ३५ टक्के जागा रिक्त राहणार असल्याचे आतापर्यंत जिल्ह्यातील महाविद्यालयात झालेल्या प्रवेशावरून दिसते.
लातूर जिल्ह्यात कला शाखेची एकूण २२० महाविद्यालये आहेत़ यात अनुदानित १४३, विनाअनुदानित ७७ महाविद्यालयांचा समावेश आहे़ लातूर शहरात २३ महाविद्यालय असून, ३१ तुकड्या आहेत़ वरीष्ठ महाविद्यालयाशी संलग्नित असणाऱ्या महाविद्यालयात १२० विद्यार्थ्यांची तुकडी तर अन्य महाविद्यालयात ८० विद्यार्थ्यांची तुकडी आहे़ या महाविद्यालयांची प्रवेश क्षमता २ हजार ९२० इतकी आहे़ महाविद्यालयाने प्रवेश प्रक्रिया नुकतीच सुरु केली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा ओढाही लातूर शहरातील नामांकित महाविद्यालयाकडे आहे. ११ वी कला वर्गासाठी थेट प्रवेश असूनही विद्यार्थ्यांची पाठ आहे. दयानंद महाविद्यालयात चार तुकड्या असून ४८० प्रवेश क्षमता आहे़ थेट प्रवेशाअंतर्गत २९० विद्यार्थ्यांनी थेट प्रवेश घेतले आहेत़ तर १०५ विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे़ तर राजर्षी शाहू महाविद्यालयात ११ वी कलाच्या तीन तुकड्यांची ३६० प्रवेश क्षमता आहे़ २९६ विद्यार्थ्यांची पहिली प्रवेश यादी नोटीस बोर्डावर डकविण्यात आली आहे़ या महाविद्यालयातीलही मागच्या वर्षी ३० जागा रिक्त राहील्या होत्या़ बसवेश्वर महाविद्यालय कला शाखेच्या तीन तुकड्या असून, ६६० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून, २८० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे़ मागच्या वर्षीही १०० जागा रिक्त होत्या़
चाकूर तालुक्यात ११ महाविद्यालयांमधून १ हजार ३६० प्रवेश क्षमता आहे़ त्यापैकी केवळ २०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, १ हजार १७० जगा अद्यापही रिक्त आहेत़ अहमदपूर तालुक्यात ५ महाविद्यालये असून, ६४० प्रवेश क्षमता आहे़ २० जूनपासून प्रवेश यादी जाहीर केली जाणार आहे़ निलंगा तालुक्यात ७ महाविद्यालय असून, ९०० प्रवेश क्षमता आहे़ आतापर्यंत १३२ प्रवेश झाले आहेत़ तर ८१६ जागा रिक्त आहेत़ उदगीर शहरात ७ महाविद्यालये असून, ६०० प्रवेश क्षमता आहे़ १०० प्रवेश झाले असून, ५०० जागा रिक्त आहेत़ रेणापूर तालुक्यात १४ महाविद्यालय असून, ८६० प्रवेश क्षमता असून, १३६ प्रवेश झाले आहेत़ (प्रतिनिधी)