वीस गावांत ३२ टँकर

By Admin | Updated: April 16, 2016 23:54 IST2016-04-16T23:49:41+5:302016-04-16T23:54:11+5:30

तुळजापूर : तालुक्यात दिवसेंदिवस पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली असून, त्याच प्रमाणात टँकरच्या आकडेवारीचा आलेख देखील चढत असल्याचे चित्र आहे.

32 tankers in twenty villages | वीस गावांत ३२ टँकर

वीस गावांत ३२ टँकर

तीव्रता वाढली : तुळजापूर तालुक्यात १४७ स्त्रोतांचे अधिग्रहण
तुळजापूर : तालुक्यात दिवसेंदिवस पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली असून, त्याच प्रमाणात टँकरच्या आकडेवारीचा आलेख देखील चढत असल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील वीस गावांमध्ये ३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, ६७ गावे, वाड्या-तांड्यांची तहान १४७ अधिग्रहणावर भागविली जात आहे.
गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे तालुक्यात यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक प्रकल्पांत अपेक्षित पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे सद्यस्थितीत बहुतांश प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. विहिरी, बोअर, कुपनलिकांचे पाणी देखील आटले असल्याने गावा-गावात पाण्यासाठी भटकंती सुरू असल्याचे चित्र आहे. त्यातच अनेक ठिकाणी तर टँकर भरण्यासाठी देखील स्त्रोत उपलब्ध नसल्याने या गावांची तहान भागविताना प्रशासनालाही मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. तालुक्यात यंदाच्या उन्हाळ्यात टँकर व अधिग्रहणाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या ३२ टँकरद्वारे दररोज ११० फेऱ्या केल्या जात असून, यामध्यमातून वीस गावातील ग्रामस्थांची तहान भागत आहे.
सद्यस्थितीत तालुक्यातील मंगरूळ, सलगरा (दि), अपसिंगा, खंडाळा, खुदावाडी, कसई, अणदूर, होर्टी, ढेकरी, किलज, जळकोट, भातंब्री, बिजनवाडी, चिंचोली, मसला (खु), माळुंब्रा, खानापूर, चिवरी, वडगाव, आरळी (खु) या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, २७ तांडे-वस्ती व ४० गावांसाठी टँकरव्यतिरिक्त विहीर, बोअर अशा ११४ स्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. याशिवाय क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडे पंचनाम्यासाठी काक्रंबा, बोरनदीवाडी, बोळेगाव, बोरगाव (तु), चिंचोली, निलेगाव, तामलवाडी, हापूर, बारूळ, किलज आणि कार्ला या गावातील १८ अधिग्रहणाचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. तसेच तहसील कार्यालयाकडे ३७ प्रस्ताव मंजुरीकडेपाठविण्यात आले आहेत. टंचाई निवारणासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. टँकर तसेच अधिग्रहणासाठी दाखल झालेल्या प्रस्तावास तातडीने मंजुरी देण्यात येत असल्याचे गटविकास अधिकारी विलास खिल्लारे यांनी सांगितले. (वार्ताहर)
अनेक गावात भटकंती : स्त्रोत उपलब्ध नसल्याने प्रशासनाचीही होतेय कसरत
सव्वादोन कोटी खर्च
तालुक्यातील पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून टँकर व अधिग्रहणावर पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे. सन २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत टंचाई उपाययोजनांवर २ कोटी ३३ लाख रुपये खर्च करण्यात आले असून, अजूनही पंचायत समितीकडे अधिग्रहण, टँकरसाठीचे अनेक प्रस्ताव दाखल होत आहेत.
एका टँकरला एका दिवसाला साधारणत: दीड हजार रुपये याप्रमाणे महिन्याकाठी ४५ हजार म्हणजेच ३२ टँकरसाठी दरमहा १४ लाख ४० हजार रुपये खर्च होत आहेत. टँकरशिवाय अधिग्रहणावर देखील दररोज हजारो रुपये खर्च करण्यात येत आहेत.

Web Title: 32 tankers in twenty villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.