दिवसभरात ३२ जणांचे अर्ज दाखल
By Admin | Updated: September 26, 2014 01:55 IST2014-09-26T00:26:02+5:302014-09-26T01:55:58+5:30
औरंगाबाद : पितृपक्ष संपताच गुरुवारी उमेदवारी भरण्यासाठी इच्छुकांनी भाऊगर्दी केली. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांत आज दिवसभरात ३२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

दिवसभरात ३२ जणांचे अर्ज दाखल
औरंगाबाद : पितृपक्ष संपताच गुरुवारी उमेदवारी भरण्यासाठी इच्छुकांनी भाऊगर्दी केली. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांत आज दिवसभरात ३२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शहरातील तीन मतदारसंघांत आज १५ जणांनी आपले अर्ज दाखल केले.
औरंगाबाद मध्य मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने आ. प्रदीप जैस्वाल, एमआयआयच्या वतीने सय्यद इम्तियाज जलील, भाजपाच्या वतीने पूनम बमणे यांनी तर अपक्ष म्हणून नगरसेवक राज वानखडे आणि संजय लष्करे या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातूनही चार जणांनी अर्ज भरले. शिवसेनेच्या वतीने आ. संजय शिरसाट, पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने गंगाधर गाडे, रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) च्या वतीने संजीवकुमार इखारे आणि अपक्ष म्हणून संजय जगताप यांनी या मतदारसंघातून अर्ज दाखल केले. तर औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून भाकपच्या वतीने भालचंद्र कांगो यांच्यासह शेख अहमद रऊफ, महंमद किस्मतवाला, लक्ष्मण प्रधान, नितीन घुगे आणि साजिद बेग पटेल या अपक्षांनी अर्ज दाखल केले.
सिल्लोड मतदारसंघातून छगन भागवत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि दादाराव आळणे यांनी बहुजन समाज पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केले. कन्नड मतदारसंघातून उदयसिंग राजपूत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उमेदवारी अर्ज भरला. फुलंब्री मतदारसंघातून रमेश दहीहंडे यांनी शिवसेनेच्या वतीने अर्ज भरला. पैठण मतदारसंघातून आ. संजय वाघचौरे आणि अनिल जाधव या दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. याशिवाय बाबासाहेब पवार, अशोक कुंढारे आणि बाबासाहेब जाधव यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले. तर गंगापूर मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी शिवसेनेच्या वतीने, तर राम बाहेती यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने उमेदवारी दाखल केली. तसेच सर्जेराव चव्हाण, सुरेश पुऱ्हे आणि कैलास फेंगाडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. वैजापूर मतदारसंघातून शिवसेनेचे आ. रंगनाथ वाणी यांनीही आज आपला अर्ज दाखल केला. याशिवाय भारत फुलारे आणि आबाजी कलापुरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले.
एमआयएमतर्फे इम्तियाज जलील यांचा अर्ज दाखल
मध्य मतदारसंघातून मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीनतर्फे (एमआयएम) ज्येष्ठ पत्रकार इम्तियाज जलील यांनी भडकलगेट येथून भव्य मिरवणूक काढून उमेदवारी अर्ज दाखल केला.
शहरातील तरुण यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एमआयएमचे आमदार अकबर ओवेसी गुरुवारी पहाटेच औरंगाबादेत दाखल झाले आहेत. त्यांना पाहण्यासाठी भडकलगेट येथील एका हॉटेलसमोर तरुणाईने मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गर्दी आवरण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत होती.
पूनमचंद बमणे यांचे शक्तिप्रदर्शन
माजी नगरसेवक पूनमचंद बमणे यांनीही आज अपक्ष उमेदवार म्हणून जोरदार शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला. सुमारे शंभर दीडशे वाहने आणि विशेष करून हर्सूल भागातील कार्यकर्त्यांची फौज घेऊन रॅली काढली. या रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. हर्सूल येथील हरसिद्धी देवीची पूजा करून तसेच हजरत कादरशाह वली यांच्या दर्ग्यात चादर चढवून रॅलीची सुरुवात करण्यात आली. ही रॅली नंतर शहागंज, पैठणगेट, मिलकॉर्नर या भागातून जाऊन अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी धीरज सिद्ध, रमेश तुळसीबागवाले, श्रीकांत जोशी आदी उपस्थित होते.
भालचंद्र कांगो यांची उमेदवारी दाखल
फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीने जाऊन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार डॉ. भालचंद्र कांगो यांनी गुरुवारी (दि.२५) उमेदवारी अर्ज दाखल केला.
एन-३, कामगार चौकातील श्रमिक कष्टकऱ्यांचे प्रतीक असलेल्या कामगार पुतळ्यास पुष्पहार घालून सकाळी ११ वाजता मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक चंदा जरीवाला, तारा लढ्ढा, अॅड. भगवानराव देशपांडे, अॅड. अरुण कापडिया, प्रा. राम बाहेती, अभिनेत्री मयुरी कांगो, पूजा पवार आदींची प्रमुख उपस्थिती
होती.
जयभवानीनगर चौकातून पुंडलिकनगरमार्गे गजानन महाराज चौकात जाऊन रॅलीचे सभेत रूपांतर झाले. या सभेला संबोधित करून डॉ. कांगो निवडक सहकाऱ्यांसह उस्मानपुऱ्यातील कार्यालयात गेले व तेथे त्यांनी उमेदवारी अर्ज सादर
केला.
अखेर गंगापूरमधून दानवे यांचा अर्ज
गंगापूर- खुलताबाद या मतदारसंघातून शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. त्यांनी बी फॉर्मही सोबत जोडला आहे. विद्यमान आ. प्रशांत बंब यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे ती जागा कुणाला सोडायची, याबाबत सेना-भाजपाचा निर्णय अधांतरी होता. गंगापूरसारख्या अनेक जागांवरून महायुतीमध्ये वाद होता. तशा जागांवर निर्णय न झाल्यामुळे महायुतीचा घटस्फोट झाला. महायुतीच्या निर्णयापूर्वीच दानवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
माजी आ.अण्णासाहेब माने, संतोष माने, जिल्हाप्रमुख दानवे यांच्यात त्या जागेसाठी प्रचंड रस्सीखेच सुरू होती. आ. बंब यांनी प्रवेश केल्यामुळे जागा भाजपाला सुटण्याची जोरदार चर्चा होती. या सगळ्या गदारोळात दानवे यांनी बाजी मारली असली तरी सेनेत मोठी फूट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दानवे म्हणाले, मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याप्रकरणी माजी आ.माने यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
शिरसाट यांची उमेदवारी
पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आ. संजय शिरसाट यांनी आज मिरवणुकीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खा.चंद्रकांत खैरे, महापौर कला ओझा, शहराध्यक्ष राजू वैद्य, उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले, बाळू गायकवाड यांची उपस्थिती होती. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॅम्पसमध्ये असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात त्यांनी अर्ज भरला. शिवाजीनगर- पासून सकाळी ११ वा. आ.शिरसाट यांची मिरवणूक निघाली.
प्रदीप जैस्वाल यांची रॅली
शिवसेनेचे औरंगाबाद ‘मध्य’ मधील उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी आज मिरवणुकीने जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास क्रांतीचौकातून ही मिरवणूक निघाली. पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौक या मार्गाने ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत ही मिरवणूक गेली. एका जीपमध्ये आ. जैस्वाल, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, जयवंत (बंडू) ओक, राजेंद्र जंजाळ हे उभे राहून अभिवादन करीत होते.
आ. जैस्वाल यांचे काही ठिकाणी महिलांनी औक्षण केले. तर गुलमंडीवर व्यापाऱ्यांनी स्वागत केले. रॅलीमध्ये अनेक कार्यकर्ते सामील झाले होते. उमेदवारी अर्ज दाखल करताना खा. चंद्रकांत खैरे, महापौर कला ओझा, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते. प्रदीप जैस्वाल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना युती नसल्याने फारसा उत्साह दिसून आला नाही. शिवसेनेचे जैस्वाल यांचे अंतर्गत विरोधक माजी आमदार किशनचंद तनवाणी, सुहास दाशरथे, नगरसेवक जगदीश सिद्ध, प्रीती तोतला आदीही गैरहजर दिसले.
गाडे यांची उमेदवारी
पश्चिम विधानसभा मतदारसंघातून एमआयएमचे उमेदवार गंगाधर गाडे यांनी आज मिरवणुकीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जावेद कुरैशी आदींची उपस्थिती होती. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॅम्पसमध्ये असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात त्यांनी अर्ज भरला. त्यांच्या मिरवणुकीत रिपाइं व एमआयएमचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.