३० प्रकल्प कोरडे
By Admin | Updated: January 7, 2015 01:05 IST2015-01-07T00:41:42+5:302015-01-07T01:05:24+5:30
औरंगाबाद : अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची परिस्थिती गंभीर बनली आहे.

३० प्रकल्प कोरडे
औरंगाबाद : अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची परिस्थिती गंभीर बनली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील १०६ पैकी तब्बल ३० लघु आणि मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत, तर उर्वरित ७६ प्रकल्पांमध्ये जेमतेम सरासरी २० टक्के पाणीसाठा आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सरासरीच्या ४० टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये यंदा पुरेसा साठा होऊ शकलेला नाही. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच यंदा अनेक प्रकल्प कोरडे पडले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात १६ मध्यम आणि ९० लघु प्रकल्प आहेत. यापैकी १ मध्यम आणि २९ लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे आहेत. जिल्ह्यातील सर्व लघु आणि मध्यम प्रकल्पांची एकूण क्षमता ३९० दलघमी आहे; पण या सर्व प्रकल्पांमध्ये सध्या एकूण अवघा ७९ दलघमी इतकाच पाणीसाठा आहे. एकूण क्षमतेचा विचार करता हा साठा अवघा २० टक्के आहे.
गतवर्षी याच तारखेला जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये ४३ टक्के उपयुक्त साठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तीव्र पाणीटंचाई जाणवणार आहे.
२३ प्रकल्प जोत्याखाली
जिल्ह्यात ३० प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले असून, आणखी २३ प्रकल्पांमधील साठा जोत्याखाली आहे. त्यामुळे हे प्रकल्पही लवकरच कोरडे पडणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पांवर ज्या गावांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत, त्या गावांना पाणीटंचाई भेडसावण्यास सुरुवात झाली आहे.