३ तहसीलदार अपडेट्; ७ जणांचे आदेशाकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: March 26, 2015 00:56 IST2015-03-26T00:47:18+5:302015-03-26T00:56:29+5:30
बाळासाहेब जाधव ,लातूर जिल्ह्यात गौण खनिजाचा उपसा करणाऱ्या वाळू व खडी केंद्र चालविणाऱ्या माफियांविरूध्द कारवाईची मोहीम सुरू केली आहे़

३ तहसीलदार अपडेट्; ७ जणांचे आदेशाकडे दुर्लक्ष
बाळासाहेब जाधव ,लातूर
जिल्ह्यात गौण खनिजाचा उपसा करणाऱ्या वाळू व खडी केंद्र चालविणाऱ्या माफियांविरूध्द कारवाईची मोहीम सुरू केली आहे़ जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा कमी कारवाई केल्यामुळे सर्वच तहसीलदारांची झाडाझडती केली. त्यामुळे जळकोट, देवणी आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यातील तहसीलदारांनी काही प्रमाणात दंडात्मक कारवाईवर भर दिला आहे तसेच थकबाकी असतानाही खडी केंद्र सुरू ठेवणाऱ्या खडी केंद्रांना सील ठोकण्याचे काम सुरू आहे़ परंतु इतर सातही तालुक्यातील तहसीलदारांनी मात्र अजूनही झोपेचे सोंग घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे चक्क दुर्लक्ष केले आहे.
गौण खनिजाचा उपसा करणाऱ्या वाळूमाफियांविरूध्द कारवाईची मोहीम सुरू केली आहे़ गौण खनिजाचा उपसा करणाऱ्या माफियांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. त्यामुळे अवैध गौण खनिजाचा उपसा करणाऱ्या ९१२ जणांवर कारवाई झाली. त्यांच्याकडून ७० लाख ३८ हजार १६१ रूपयाचा दंड वसूल केला आहे़ यामध्ये किरकोळ वाळू वाहतूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करून मुख्य गौण खनिजाचा उपसा करणाऱ्या माफियांकडे दुर्लक्ष केले असल्याचे आढळून आलेले आहे़ तसेच २०१४-१५ साठी लातूर जिल्ह्याला २० कोटी ३ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १४ कोटी ३८ लाख ३ हजार ७३९ रूपयांचा दंड वसूल आहे़ उर्वरीत ६ कोटींच्या वसुलीसाठी ३१ मार्चची डेड्लाईन दिली आहे. फक्त तीन तालुक्यांच्या तहसीलदारांनी कारवाईला गती दिली आहे़ जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जळकोटमध्ये एका खडी केंद्रवाल्याकडून दोन लाख रूपये व बंद असलेल्या एका खडी केंद्राकडून १ लाख रूपयाचा दंड वसूल केला. देवणी तालुक्यातील पाच खडीकेंद्राकडून प्रत्येकी ५ लाख रूपये या प्रमाणे २५ लाख रूपये वसूल केले. तर वाळूतून ४ लाखांचा दंड असे एकूण २९ लाख रूपये वसूल केले आहेत़