जायकवाडीत २८.३४ टक्के जलसाठा
By Admin | Updated: December 13, 2014 00:28 IST2014-12-13T00:16:44+5:302014-12-13T00:28:53+5:30
पैठण : मुळा धरणातून सोडलेले पाणी जायकवाडी धरणात ५५१३ क्युसेक्स प्रतितास या क्षमतेने दाखल होत आहे. या पाण्यामुळे धरणाचा जलसाठा १ टीएमसीने वाढला आहे.

जायकवाडीत २८.३४ टक्के जलसाठा
पैठण : मुळा धरणातून सोडलेले पाणी जायकवाडी धरणात ५५१३ क्युसेक्स प्रतितास या क्षमतेने दाखल होत आहे. या पाण्यामुळे धरणाचा जलसाठा १ टीएमसीने वाढला आहे. दरम्यान, भंडारदरा धरणातून सोडण्यात आलेले पाणी अद्याप प्रवासात असून, ते रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास जायकवाडीत दाखल होण्याची अपेक्षा कार्यकारी अभियंता संजय भर्गोदेव यांनी व्यक्त केली आहे. धरणात शुक्रवारी २८.३४ टक्के एवढा जलसाठा
होता.
मुळा धरणातून सोडलेले पाणी दि. १० रोजी पहाटे जायकवाडीत दाखल झाले. त्या दिवशी धरणाची पाणी पातळी ही १५०५.०९ फूट एवढी होती. धरणात एकूण जलसाठा हा १३२५.७४ द.ल.घ.मी. एवढा होता, तर एकूण जलसाठा २७.०६ टक्के एवढा होता. दोन दिवसांत दाखल झालेल्या पाण्यामुळे पाणी पातळीत वाढ होऊन १५०५.४६ फूट झाली आहे, तर एकूण जलसाठा १३५३.४६२ द.ल.घ.मी. एवढा झाला आहे. शुक्रवारी धरणात २८.३४ टक्के जलसाठा झाला आहे. या जलसाठ्यापैकी ६१५.३५६ द.ल.घ.मी. उपयुक्त जलसाठा आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणातून ७०३० क्युसेक्स व भंडारदरा धरणातून ७०९८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. भंडारदरा धरणातून निळवंडे धरणात व निळवंडेतून ओझर वेअरमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. ओझर वेअरमधून पाणी जायकवाडीत येते; मात्र निळवंडेतून पाणी अद्याप ओझर वेअरपर्यंत पोहोचले नसून ते रात्री १० वाजता ओझर वेअरला पोहोचेल, असे कार्यकारी अभियंता संजय भर्गोदेव यांनी सांगितले. तेथून पुढे ते दोन दिवसांनी जायकवाडीत पोहोचणार आहे. हे पाणी पोहोचल्यानंतर जायकवाडीच्या पाणी पातळीत गतीने वाढ होणार आहे. आजपर्यंत धरणात २७.७२२ द.ल.घ.मी.ने व १.२८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.