२७ प्रस्तावांना मंजुरीची प्रतीक्षा
By Admin | Updated: November 30, 2015 23:30 IST2015-11-30T23:22:41+5:302015-11-30T23:30:42+5:30
ईट : निर्माण झालेल्या चारा टंचाईवर मात करून पशुधनाची उपासमार थांबविण्यासाठी भूम तालुक्यातील ईट परिसरातून २७ प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल करण्यात आले आहेत.

२७ प्रस्तावांना मंजुरीची प्रतीक्षा
ईट : निर्माण झालेल्या चारा टंचाईवर मात करून पशुधनाची उपासमार थांबविण्यासाठी भूम तालुक्यातील ईट परिसरातून २७ प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल करण्यात आले आहेत. परंतु, प्रशासनाकडून अद्याप एकाही प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसून, तीन ठिकाणी तर मंजुरीविना छावण्या सुरू करून पशुंची सोय करण्यात आली आहे.
मागील तीन-चार वर्षांपासून होत असलेल्या अत्यल्प पावसामुळे परिसरात पिण्याच्या पाण्यासह पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यंदा तर पावसाळ्यातही अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. अजूनही अनेक गावांना टँकरवर तहान भागवावी लागत आहे. गतवर्षी जूनच्या सुरूवातीला झालेल्या अत्यल्प पावसानंतर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. मात्र, नंतर पाऊसच झाला नसल्याने खरिपाची पिके वाया गेली. त्यानंतर पाऊस पडेल या आशेवर रबीची पेरणी झाली. पेरणीवेळी जमिनीत थोडाफार ओलावा असल्याने काही प्रमाणात हरभऱ्याची उगवणही झाली. परंतु, पुन्हा पाऊसच झाला नसल्याने सध्या हे पीकही करपून जात आहे.
शेतातील कुठलेच पीक हाती न लागल्याने या भागात सध्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ईटसह परिसारतील एकूण वीस गावांमधील पशुधनाची संख्या १६ हजाराच्या आसपास असून, चाराच उपलब्ध नसल्यामुळे या जनावरांची सध्या उपासमार सुरू आहे. यावर मात करण्यासाठी या भागातील एक-दोन नव्हे तर तब्बल २७ संस्थांनी प्रशासनाकडे चारा छावणीचे प्रस्ताव दाखल केले. परंतु, प्रशासनाकडून मात्र अद्याप एकाही प्रस्तावाला मंजुरीदेण्यात आलेली नाही. त्यामुळे पशुधन जगवायचे कसे, असा प्रश्न पशुपालकांसमोर निर्माण झाला आहे. आज ना उद्या छावणीला मंजुरी मिळेल, या आशेवर अखेर तिघांनी स्वखर्चातून छावण्या सुरू केल्या आहेत. दरम्यान, याबाबत भूमचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सर्व संस्थांचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. मंजुरी मिळताच तात्काळ छावण्या सुरू केल्या जातील, असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)