२७९ गावांत पाणी दूषित
By Admin | Updated: May 20, 2014 01:10 IST2014-05-20T00:37:37+5:302014-05-20T01:10:52+5:30
बीड : जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत असताना दुसरीकडे उपलब्ध पाण्यापैकी तब्बल २४ टक्के पाणी दूषित असल्याचा धक्कादायक निष्कर्ष
२७९ गावांत पाणी दूषित
बीड : जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत असताना दुसरीकडे उपलब्ध पाण्यापैकी तब्बल २४ टक्के पाणी दूषित असल्याचा धक्कादायक निष्कर्ष आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीतून पुढे आला आहे़ आजघडीला २७९ गावे दूषित पाणी पीत आहेत़ त्यामुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे़ जिल्ह्यात एकूण १०२४ ग्रामपंचायती आहेत़ प्राथमिक आरोग्य केंदांनी एप्रिल महिन्यात अकरा तालुक्यांतील ११५७ पाणी नमूने तपासले़ त्यापैकी तब्बल २७९ नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे़ दूषित पाण्याची टक्केवारी २४ टक्के इतकी आहे़ ही टक्केवारी आरोग्यासाठी घातक आहे़ दूषित पाणी पोटात गेल्याने विविध जलजन्य आजारांना निमंत्रण मिळते़ त्यामुळे नळयोजनेचे किंवा शुद्धीकरण केलेले पाणीच प्यायले पाहिजे, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे़ दरम्यान, पाणीटंचाई प्रश्न गंभीर बनल्याने दृषित पाण्यावरच तृष्णा भागविल्याशिवाय नागरिकांना पर्याय नाही़ त्यामुळे जलजन्य आजारांचे रुग्ण वाढत असून सामान्यांना आर्थिक व शारीरिक झळ सहन करावी लागत आहे़ दरम्यान, पाण्यातील अणूजीव तपासणीबरोबरच रासायनिक पाणी नमुने तपासणीही करण्याचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले आहे़ त्यानुसार जिल्ह्यातील २०५७ नमूने तपासणीसाठी घेतली आहेत़ दूषित पाण्याने होणारे आजार दूषित पाणी प्यायल्याने गॅस्ट्रो, कॉलरा, काविळ, विषमज्वर, अतिसार हे रोग होण्याची दाट शक्यता असते़ हे आजार थेट आरोग्यावर परिणाम करतात़ त्यामुळे शुद्ध पाणी पिणे हाच सर्वांत महत्त्वाचा पर्याय आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ गोवर्धन डोईफोडे यांनी सांगितले़ पाणी शुद्धीकरणासाठी ग्रामपंचायतींना ब्लिचींग पावडर पुरविलेली आहे़ ती पाण्यात टाक ने आवश्यक आहे़ नागरिकांनीही वैयक्तिक काळजी घ्यावी़ घागरभर पाण्यात लिक्वीड क्लोरिनचे पाच थेंब आवश्य टाकावेत असा सल्ला डॉ़ डोईफोडे यांनी दिला़ स्वच्छतेचे काम पावसाळ्यापूर्वी दूषित पाणी कमी करण्यासाठी ग्रामपंचायतींना पाणी गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत स्वच्छता सर्वेक्षण हा उपक्रम राबविण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत़ याअंतर्गत हातपंपाची कठडे दुरुस्ती, हातपंपाशेजारील गटारींचे पाणी वाहते करणे ही कामे करावयाची असून हातपंपाजवळ कोणीही शौचास बसू नये, याची दक्षता घ्यायची आहे़ शिवाय पाण्यात ब्लिचींग पावडर टाकली की नाही? याची खातरजमा क्लोरोस्कोपद्वारे जलसुरक्षक यांना करावयाची आहे़, अशी माहिती साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ़ पी़ के़ पिंगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ (प्रतिनिधी)