२२५ पैकी होणार ७० कोटींची कामे; सत्ताधाऱ्यांची दमछाक
By Admin | Updated: June 27, 2014 01:05 IST2014-06-27T00:58:16+5:302014-06-27T01:05:00+5:30
औरंगाबाद : शहरातील वॉर्डांमधील सुमारे २२५ कोटी रुपयांची ४ वर्षांत शिल्लक राहिलेल्या कामांपैकी १५० कोटींची कामे रखडण्याची शक्यता असल्यामुळे सत्ताधाऱ्यांची दमछाक सुरू झाली आहे.

२२५ पैकी होणार ७० कोटींची कामे; सत्ताधाऱ्यांची दमछाक
औरंगाबाद : शहरातील वॉर्डांमधील सुमारे २२५ कोटी रुपयांची ४ वर्षांत शिल्लक राहिलेल्या कामांपैकी १५० कोटींची कामे रखडण्याची शक्यता असल्यामुळे सत्ताधाऱ्यांची दमछाक सुरू झाली आहे. ती कामे २०१४-१५ च्या बजेटमध्ये घेतलेली नव्हती. त्यामुळे महापौरांनी बजेटमध्ये १२७ कोटी रुपयांची दणदणीत वाढ केली. यंदाचे बजेट वास्तववादी आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले होते. शिल्लक राहिलेल्या कामांसाठी सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असे ठरले होते. मात्र, तसा कोणताही निर्णय झालेला नाही.
वर्ष २०१४-१५ च्या अर्थसंकल्पात १२७ कोटी रुपयांची दणदणीत वाढ केल्याने बजेट ७९० कोटींवर गेले आहे. पालिकेचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे नगरसेवकांनी विकासकामांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. पालिका प्रशासनाने ५४९ कोटी ११ लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर स्थायी समितीच्या वाढीनंतर तो ६६३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. एलबीटीचे उत्पन्न दोन महिन्यांपासून २० कोटींनी घटले आहे, तर मालमत्ताकरातून पालिकेला हवे तसे उत्पन्न अजून मिळालेले नाही.
महापौरांचे
आयुक्तांना पत्र
महापौर कला ओझा यांनी आज आयुक्तांना बजेटच्या बाबतीत पत्र दिले. नगरसेवकांची कामे थांबवू नका. शिल्लक राहिलेली (स्पील ओव्हर) ची कामे पूर्ण करा. महापौर म्हणाल्या, दोन-तीन दिवसांत बजेटमध्ये शिल्लक कामांचा समावेश होईल. त्यासाठीच आयुक्तांना पत्र दिले आहे.
वाढविलेली कामे अशी -
२०१३-१४ च्या शिल्लक कामांसाठी- ७० कोटी, नगरसेवकांना वॉर्डात विकासकामांसाठी- २० कोटी ५० लाख, प्रमुख रस्ते व त्यावर पूल बांधण्यासाठी- २७ कोटी, महापौर विकास निधी- १० कोटी
उत्पन्न वाढविण्याचे लक्ष्य -
एलबीटी- ३०० कोटी,
मालमत्ताकर- १५६ कोटी २५ लाख,
नगररचना विभाग- ७५ कोटी,
मालमत्ता उत्पन्न- १० कोटी,
शासकीय अनुदान- ८० कोटी ३८
लाख, पाणीपट्टी वसुली- ५५ कोटी ४ लाख