भूमिगत गटारीसाठी २१६ कोटी रुपये मंजूर
By Admin | Updated: May 26, 2014 00:23 IST2014-05-25T23:43:38+5:302014-05-26T00:23:10+5:30
बीड:शहरात भूमिगत गटार करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने २१६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

भूमिगत गटारीसाठी २१६ कोटी रुपये मंजूर
बीड:शहरात भूमिगत गटार करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने २१६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तीन वर्षांत भूमिगत गटारीचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी रविवारी पत्रकारपरिषदेत दिली. शहरातील भूमिगत गटारीच्या कामाचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून होता; परंतु शहरातील पाणीपुरवठ्याला प्राधान्य द्यावे लागले. बीड पालिकेने केंद्राच्या शहरी विकास विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर स्वत: नगरविकासमंत्री कमलनाथ यांना बोलले. त्यानंतर बीड पालिकेसाठी भरीव निधीची तरतूद झाली, असे डॉ. क्षीरसागर यांनी सांगितले. पालिका , राज्य सरकार दहा टक्के खर्च करणार आहे तर केंद्र सरकार ८० टक्के निधी अनुदान स्वरुपात देणार आहे. राज्यातील सहा पालिकांना हा निधी मिळाला असून त्यात बीडचा समावेश आहे. जायकवाडीतील पाणी उपलब्ध केल्याने भूमिगत गटारीच्या कामास मंजुरी मिळू शकली. हे काम दर्जेदार करण्यात येणार असून गटारीचे पाणी शेतीसाठी वापरात आणण्यात येणार आहे. शिवाय इतर कामांसाठीही त्याचा पुर्नवापर करता येऊ शकतो का? हे देखील पाहिले जाणार असल्याचे डॉ. क्षीरसागर यांनी सांगितले. भूमिगत गटारीमुळे मलेरिया व साथरोग प्रतिबंधक कार्यक्रमावर होणारा खर्च वाचणार आहे. शिवाय सफाई कामगारही कमी लागतील. शहरवासियांच्या आरोग्याच्या दृष्टीने भूमिगत गटारी अतिशय महत्त्वाच्या होत्या. हा प्रश्न मार्गी लागत असल्याचे समाधान आहे, असे ते म्हणाले. हद्दवाडीपासून सुरुवात भूमिगत गटारीच्या कामांना हद्दवाढीच्या भागांपासून होईल. एकूण २१६ किमी अंतरापर्यंत भूमिगत गटार तयार केले जाणार आहे. शहरातील नाल्या, रस्ते यामुळे या कामात अडचणी येऊ नयेत म्हणून हद्दवाढीच्या भागांना प्राधान्य देण्यात येणार आहे. गटारीचे पाणी साठविण्यासाठी शहराबाहेर कॅनॉल उभारण्यात येणार आहेत. चार झोनमध्ये काम भूमिगत गटारीचे काम चार झोनमध्ये होणार आहे. एबीसीडी अशी नावे देऊन शहरातील चारही बाजूने काम करण्यात येईल. पावसाळा संपल्यानंतर कामास सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी) भाजीमंडईचे काम प्रगतीपथावर शेतकर्यांचा भाजीपाला थेट ग्राहकांना मिळाला पाहिजे, यासाठी वातानुकुलित भाजीमंडई सिद्धीविनायक कॉम्पलेक्स परिसरात उभारण्यात येणार आहे. त्याचे काम प्रगतीपथावर आहे, असे गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले.