बीएसएनएलचे गतिमान सेवेसाठी २०३ नवीन टॉवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:46 IST2017-10-18T00:46:33+5:302017-10-18T00:46:33+5:30
मोबाइल नेटवर्कही अद्ययावत करून गतिमान सेवा देण्यासाठी बीएसएनएल सरसावली आहे. याअंतर्गत जिल्ह्यात नवीन १५८ ३-जी आणि ४५ नवीन २-जी टॉवर उभारण्यात येणार आहेत

बीएसएनएलचे गतिमान सेवेसाठी २०३ नवीन टॉवर
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मोबाइल नेटवर्कही अद्ययावत करून गतिमान सेवा देण्यासाठी बीएसएनएल सरसावली आहे. याअंतर्गत जिल्ह्यात नवीन १५८ ३-जी आणि ४५ नवीन २-जी टॉवर उभारण्यात येणार आहेत. हे टॉवर उभारल्यानंतर एका सेकंदाला १०० एमबीपीएसपेक्षा जास्त डाटा डाऊनलोड केल्या जाऊ शकतो. एवढी अफाट गती प्राप्त होणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, टॉवर २-जी व ३-जी असले तरी प्रत्यक्षात ते ४-जी व ५-जीची सेवा पुरविण्यासाठी तेवढेच सक्षम असणार आहेत. येत्या जानेवारी महिन्यापर्यंत टॉवर उभारणीचे काम पूर्ण होईल, अशी माहिती बीएसएनएलचे प्रधान महाव्यवस्थापक अरविंद वडनेरकर यांनी दिली.
नोव्हेबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होत आहे. यानिमित्ताने आयोजित पत्रपरिषद वडनेरकर यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रात ३-जीचे ३७२८ आणि २-जीचे १५०० टॉवर उभारण्यात येणार आहेत. यात १२०० कोटी खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान देणा-या नोकियाला देण्यात आला आहे.
मोबाइल बाजारात अटातटीची स्पर्धा सुरू असूनही बीएनएनएलने मागील आर्थिक वर्षात जिल्ह्यात ३२५०० नवे ग्राहक जोडले आहेत. तसेच आता जिथे ब्रॉडबँड सेवा पुरविल्या जाऊ शकत नाही. तिथे केबल टीव्ही आॅपरेटरच्या माध्यमातून ग्राहकांच्या घरापर्यंत आॅप्टिकल फायबर केबल्सवर हायस्पीड ब्रॉडबँड सेवा पुरविण्यात येणार आहे.
यासाठी प्रथम खुलताबाद व वाळूज अशा दोन ठिकाणच्या टीव्ही केबल आॅपरेटरसोबत करार करण्यात येत आहे. याद्वारे जिल्ह्यात यावर्षी ५० हजारांपेक्षा अधिक ब्रॉडबँड कनेक्शन जोडले जातील. बीएसएनएल आता एका सामान्य सरकारी नोकरशाही दृष्टिकोन असलेली संस्था राहिली नसून ग्राहक केंद्रित व ग्राहकाभिमुख बनली आहे. मागील काही वर्षांत हा बदल घडून आल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.