२० उमेदवारांची अनामत रक्कम जप्त
By Admin | Updated: May 18, 2014 00:51 IST2014-05-18T00:37:37+5:302014-05-18T00:51:21+5:30
जालना : लोकसभा मतदारसंघात एकूण २२ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले.

२० उमेदवारांची अनामत रक्कम जप्त
जालना : लोकसभा मतदारसंघात एकूण २२ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. यातील प्रमुख दोन उमेदवार वगळता अन्य २० उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. अनामत रक्कम (डिपॉजिट) वाचविण्यासाठी एकूण वैध मतांच्या एक षष्टांश (१/६) मतांची आवश्यकता असते. शुक्रवारी मतमोजणीमध्ये अनामत रक्कम वाचविण्यासाठी १ लाख मतांची किमान गरज होती. जालना लोकसभा मतदारसंघात विजयी उमेदवार रावसाहेब दानवे व त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार विलास औताडे हे दोनच उमेदवार एक लाखांपेक्षा अधिकचा आकडा पार करू शकले. अनामत रक्कमेचा जादुई आकडा काढण्यासाठी ‘नोटा’ हे वैध मतदान असले तरी त्या मतदानाचा वैध मतदानात समावेश करता येत नाही. त्यामुळे मतदानाच्या म्हणजेच १ लाख पेक्षा अधिक मते असल्यास उमेदवार आपली अनामत रक्कम वाचवू शकतो. मतमोजणीनंतर रावसाहेब दानवे यांना ५ लाख ९१,४२८ तर विलास औताडे यांना ३ लाख ८४,६३० एवढी मते मिळाल्याने त्यांची अनामत रक्कम सुरक्षित राहिली. मात्र २० उमेदवारांना आपली अनामत रक्कम गमवावी लागली. यामध्ये सर्वसाधारण मतदारसंघासाठी २५ हजार तर अनुसूचित जातीसाठी १२ हजार ५०० रुपये इतकी अनामत रक्कम भरण्यात आली होती. अनामत रक्कम जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये बसपाचे डॉ. शरदचंद्र वानखेडे, सपाचे कुंजबिहारी अग्रवाल, आपचे दिलीप म्हस्के, डब्ल्यूपीआयचे मिर्झा अफसर बेग, एमडीपीचे मो.अशद शे.अहमद, बीएपीचे रमेश राठोड, एपीआयचे विठ्ठल शेळके, एएनसीचे संजय हिवाळे, अशोक सोनवणे, रामभाऊ उनगे, गणेश करांडे, प्रतापसिंह काकरवाल, म.जावेद म. वहाब, ज्ञानेश्वर नाडे, बबासाहेब शिंदे, अॅड महेश खरात, चिंचोरे, लीलाबाई सपकाळ, स.हुसेन अहमद, यांचा समावेश आहे. दरम्यान, या निवडणुकीत दोघांव्यतिरिक्त अन्य कोण्याही उमेदवाराने लक्षणीय मते न मिळविल्याचे चित्र समोर आले आहे. (प्रतिनिधी) जालना लोकसभा मतदारसंघातून यावेळी उमेदवारांची संख्या अधिक होती. त्यामुळे कोणते उमेदवार किती मते घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, ही लढत दुरंगीच झाल्याने अन्य उमेदवारांना मते कमी मिळाली. यात काही राष्टÑीय पक्षांच्या उमेदवारांचाही समावेश आहे.