२ हजार कोटी ‘पाण्यात’

By Admin | Updated: September 20, 2015 01:12 IST2015-09-20T00:59:23+5:302015-09-20T01:12:13+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवार व शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरिजा व अंजना नदीला आलेल्या पुरात दोघे जण वाहून गेले.

2 thousand crores 'water' | २ हजार कोटी ‘पाण्यात’

२ हजार कोटी ‘पाण्यात’

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवार व शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरिजा व अंजना नदीला आलेल्या पुरात दोघे जण वाहून गेले. सिल्लोड, फुलंब्री व औरंगाबाद तालुक्यांतील किमान ५० हजार हेक्टर जमिनीवरील पिके नष्ट झालीत व हजारो हेक्टर शेतजमीन खंगाळून वाहून गेली. रस्ते, पूल वाहून गेले. किमान १५ बंधारे फुटले. दीड ते दोन हजार घरांची पडझड झाली व तेवढ्याच नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले. या अतिवृष्टीने दोन हजार कोटींहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात झालेल्या पावसाने सिल्लोड, फुलंब्री, सोयगाव, औरंगाबाद हे तालुके अधिक प्रभावित झाले. गिरिजा, दुधना, पूर्णा, सोना, अंजना, वाघिरा या नदीकाठावरील गावांचे पुरामुळे नुकसान झाले. त्यात गिरिजा, दुधना व सोना नद्यांमुळे अधिक नुकसान झाले. गिरिजा नदीवर ठिकठिकाणी बांधण्यात आलेले दहांहून अधिक बंधारे वाहून गेले आहेत. सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी- मूकपाठचा पाझर तलाव फुटला. औरंगाबाद तालुक्यातील देमणी शिवारातील सिमेंट बंधारा पुरात वाहून गेला. दुधना नदीचे पात्र पुराने फुगल्यामुळे औरंगपूर, शेलूदचाथा, लाडसावंगी आदी परिसरातील दहा गावांतील शेतपिकांवर गाळ अंथरला गेला. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली. या गावांतील ४०० हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. त्या नागरिकांची घरे पुरात वाहून गेली आहेत.
सिल्लोड तालुक्यात गुरुवारी १५७.८८ मि.मी., तर शुक्रवारी ६८.६३ मि.मी. असा २२६.५१ मि.मी. पाऊस झाला. तालुक्यातील बनकिन्होळा, गेवराई सेमी, सोयगाव तालुक्यातील १०० च्या वर घरे उद्ध्वस्त झाली आहेत, तर ६० कुटुंबे बेघर झाली आहेत. बेघर झालेल्या कुटुंबांचे गावातीलच जि.प.च्या शाळेत स्थलांतर केले आहे. त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे. अतिवृष्टीमुळे नदीकाठी असलेल्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जवळपास ९०० हेक्टर क्षेत्रावरील शेतजमीन वाहून गेली आहे. अंदाजे २० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असावीत. मका, बाजरी, कपाशी सोयाबीन पिके आडवी झाली आहेत.
फुलंब्री तालुक्यात फुलमस्ता नदी तीरावरील गावांना नुकसान सहन करावे लागले. बोरगाव अर्ज गावाला पुराचा मोठा फटका बसला. भरून वाहणाऱ्या गिरिजा नदीच्या पात्राने ऐनवेळेस पात्र बदलल्याने शेकडो एकर शेतीवरील पिके वाहून गेली.
सोयगाव तालुक्यात दोन दिवसांत २२४ मि.मी. पाऊस झाला. सोनानदीला आलेल्या पुरामुळे नदीपात्रालगतच्या गावातील घरांची पडझड झाली. या भागातून जनावरे व पिकेही वाहून गेली. सुदैवाने काहीही जीवित हानी झाली नाही.
या पावसाने फुलंब्री, सिल्लोड, कन्नड, खुलताबाद व सोयगाव तालुक्यांतील बहुतांश मध्यम प्रकल्प व लघु तलाव, बांध-बंधारे, शेततळी भरली आहेत.
दोघे मृत्युमुखी
रामनदीला आलेल्या पुरात पुंडलिक शंकर कोलते (४८, रा. भालगाव, ता. फुलंब्री) व संजय सोमनाथ चव्हाण (३८, रा. भांडेगाव- सुलतानपूर, ता. खुलताबाद) हे अंजना नदीला आलेल्या पुरात वाहून गेले. दोघांचे प्रेत शनिवारी सापडले.

Web Title: 2 thousand crores 'water'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.