१९ साठवण तलाव ‘फुल्ल’
By Admin | Updated: September 3, 2014 01:10 IST2014-09-03T01:05:32+5:302014-09-03T01:10:13+5:30
उस्मानाबाद : सलग दोन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेखाली असणारा जिल्ह्याला मागील चार ते पाच दिवसांत झालेल्या पावसाने चांगलाच दिलासा मिळाला आहे.

१९ साठवण तलाव ‘फुल्ल’
उस्मानाबाद : सलग दोन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेखाली असणारा जिल्ह्याला मागील चार ते पाच दिवसांत झालेल्या पावसाने चांगलाच दिलासा मिळाला आहे. मागील चार ते पाच वर्षांत जिल्ह्यात भर पावसाळयात टँकरची संख्या शंभरावर होती मात्र आता टँकर संख्या तीनवर आली आहे. तसेच पाच तालुक्यांतील १९ तलाव हे शंभर टक्के भरले आहेत.
जुलै महिना उजाडला तरी पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे जिल्ह्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचे संकट आले होते. जुलै महिन्यात टँकरची संख्या शंभरावर होती. मात्र त्यानंतर आॅगस्ट महिन्यात काही तालुक्यात पाऊस झाल्याने ही संख्या ७२ झाली तर विहीर व बोअरचे अधिग्रहणांची संख्याही ४६० झाली. मात्र आॅगस्ट महिन्यांच्या शेवटच्या आठवडयात झालेल्या पावसाने टँकरची संख्या तीन तर अधिग्रहणांची संख्या ७ आहे.
सद्य:स्थितीत भूम तालुक्यातील एक गाव व चार वाड्यावर दोन टँकरने पाणीपुरवठा तसेच दोन ठिकाणी अधिग्रहण करण्यात आले आहे.
परंडा तालुक्यात एका टँकरने एका गावात पाणीपुरवठा व तीन गावांत पाच ठिकाणी अधिग्रहण करुन प्रशासनाच्या वतीने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दोन वर्षांपासून पावसाच्या प्रमाणात कमालीची घट झाल्याने विहिरी, विंधन विहीरीची पाणी पातळी कमालीची घट झालेली होती.
यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला होता. मात्र आॅगस्ट महिन्यात शेवटच्या आठवडयात जिल्ह्याच्या विविध भागात जोराचा पाऊस झाल्याने या भागात विविध प्रकल्पातील पाणीसाठा चांगलाच वाढल्याने उस्मानाबाद जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, कळंब व लोहारा हे पाच तालुके सद्यस्थितीत टँकरमुक्त झाले असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.