१६०० कोटीत २४ टीएमसी पाणी

By Admin | Updated: April 16, 2016 23:43 IST2016-04-16T23:34:11+5:302016-04-16T23:43:02+5:30

उदगीर : पुर्वीच्या सरकारने ७० हजार कोटी खर्चून प्रत्यक्षात एक टक्काही सिंचन काम केले नाही़ मी मंत्रालय सांभाळताना जलयुक्तच्या माध्यमातून

1600 crores 24 TMC water | १६०० कोटीत २४ टीएमसी पाणी

१६०० कोटीत २४ टीएमसी पाणी

पालकमंत्र्यांचा दावा : ‘ग्रामोदय’ अभियानाचा शुभारंभ
उदगीर : पुर्वीच्या सरकारने ७० हजार कोटी खर्चून प्रत्यक्षात एक टक्काही सिंचन काम केले नाही़ मी मंत्रालय सांभाळताना जलयुक्तच्या माध्यमातून आतापर्यंत २४ टिएमसी पाणी सिंचनासाठी उपलब्ध करुन देण्याचे कार्य केले आहे़ यासाठी पुर्वीच्या सरकारने किमान ४२०० कोटी खर्च केले असत़े़ मात्र आपण हे काम केवळ १६०० कोटींमध्ये केल्याचा दावा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी केला़
उदगीर तालुक्यातील सताळा येथे झालेल्या जलयुक्त शिवार उपक्रम अंतर्गत कामांची पाहणी व ‘ग्रामोदयातून भारत उदय’ अभियानाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते शनिवारी झाला़ अध्यक्षस्थानी आ़ सुधाकर भालेराव होते़ तर व्यासपीठावर जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, जि़ प़ महिला बालकल्याण सभापती सुलोचना बिदादा, भाजपा जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, उपविभागीय अधिकारी डॉ़ विकास खरात, तहसीलदार राहुल पाटील चेअरमन लक्ष्मण बिरगे, सरपंच सिंधुताई टंगेटोल आदींची प्रमुख उपस्थिती होती़
जि़ प़ सदस्य रामचंद्र तिरुके यांनी सताळा परिसरात झालेल्या विकास कामांचा आढावा प्रास्ताविकात मांडला़ ग्रामोदय से भारत उदय, स्वच्छ भारत मिशन कक्ष जनजागृती व पंतप्रधान पीक विमा योजना घडीपुस्तिकांचे यावेळी विमोचन करण्यात आले़ तसेच लाभार्थी शेतकऱ्यांना साहित्य वाटप करण्यात आले़
यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी सताळा गावात झालेल्या जलयुक्त कामास पाहुन समाधानी असल्याचे सांगून १० लाख रुपयांचा निधी पुढील विकास कामासाठी देत असल्याची घोषणा केली़ महाराष्ट्रातील लातूर व बीड जिल्ह्यांनी दिग्गज नेते दिले़ हे जिल्हे पालकमंत्री म्हणून सांभाळणे अवघड आहेत़ स्त्रीचा काटकसर स्वभावगुण या मंत्रालयात काम करताना कामी येत आहे़ आ़ भालेराव यांनी हे गाव दत्तक घ्यावे मी लागेल ती मदत करेल असेही यावेळी मुंडे म्हणाल्या़
यावेळी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दुर्मिळ छायाचित्र संग्रहाचे उद्घाटन झाले़ सूत्रसंचालन धनंजय गुडसूरकर यांनी केले तर आभार गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी मानले़
यावेळी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
होती़ (प्रतिनिधी)
जलयुक्तशी नाळ पुर्वीपासूनच़़़
सत्तेत नसताना वैद्यनाथ पॅटर्न नावाखाली मी जलयुक्त शिवार कार्यक्रम सुरु केला़ जात, पात आणि वय या भिंती तोडून गावाच्या एकतेतून विकास करण्यासाठी जलयुक्त आहे़ ज्या माता भगिनींनी माझ्या डोक्यावर आशिर्वादाचा हात ठेवला त्या माता भगिनींच्या डोक्यांवरील हंडा उतरविण्याचे कार्य मी करणार आहे असा उल्लेख मंत्री मुंडे यांनी यावेळी केला़
सताळा येथील जलयुक्त विकास कामांना पाहुन भारावून गेलेल्या मंत्री महोदया मुंडे यांनी माझ्यापेक्षा विकास कामाचे फोटो काढा ते महत्वाचे आहे असे म्हणत आपल्या मोबाईल मधुन विकास कामासोबत सेल्फी काढला़

Web Title: 1600 crores 24 TMC water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.