१५,८३१ नवागत ‘स्कूल चले’

By Admin | Updated: June 17, 2014 01:14 IST2014-06-17T00:44:29+5:302014-06-17T01:14:06+5:30

उस्मानाबाद : दोन महिन्यांच्या सुटीनंंतर संपल्यानंतर सोमवारी शाळा भरल्या.

15,831 new 'go to school' | १५,८३१ नवागत ‘स्कूल चले’

१५,८३१ नवागत ‘स्कूल चले’

उस्मानाबाद : दोन महिन्यांच्या सुटीनंंतर संपल्यानंतर सोमवारी शाळा भरल्या. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने नव्याने पहिल्याच्या वर्गामध्ये दाखल झालेले विद्यार्थी मोठ्या आनंदात होते. पहिल्याच दिवशी पुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदामध्ये अधिकची भर पडली. १९ हजार ७८९ पैकी सोमवारी तब्बल १५८३१ नवागत विद्यार्थी शाळेत दाखल झाले. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांनी विविध शाळांना भेटी देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
शाळेला १५ एप्रिलपासून सुट्या लागल्या होत्या. तर शिक्षकांना १ मे रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर सुट्या मिळाल्या. तब्बल दोन महिने सुट्यांचा आनंद लुटल्यानंतर सोमवारी शाळांना प्रारंभ झाला. सकाळपासूनच मुख्याध्यापक, शिक्षक आपआपल्या शाळांमध्ये नवागतांसोबतच अन्य विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज होते. काही शाळांमध्ये तोरणे बांधली होती. तसेच परिसरात पताका लावण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे शाळेसमोरील प्रांगण रांगोळीने सजविले होते. शाळा भरताच त्या-त्या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले. तसेच त्यांना पाठ्यपुस्तकांचेही वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहताना दिसून आला. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे आणि उपशिक्षणाधिकारी जाधव यांनी आलूर, जळकोट, गंधोरा, तुळजापूर आणि रुईभर येथील शाळांना अचानक भेटी देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
त्यानंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, शिक्षणाधिकारी औदुंबर उकीरडे यांनी सांजा, करजखेडा, उपळा आणि तेर येथील शाळांना भेट देवून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, सुमन रावत यांनी कौडगाव, खानापूर, वडजी, नांदगाव आणि कडकनाथवाडी येथील शाळांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी नवागत विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे स्वागत केले. तसेच माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नलावडे यांनीही उस्मानाबाद तालुक्यातील काही शाळांना भेटी दिल्या. शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार चालू शैक्षणिक वर्षात पहिलीच्या वर्गामध्ये १९ हजार ७८९ नवागत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले होते. पहिल्याच दिवशी ८० टक्के उद्दीष्ट साध्य झाले आहे. तब्बल १५ हजार ८३१ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी औदुंबर उकीरडे यांनी दिली. (प्रतिनिधी)
मेडसिंग्याची शाळा दोन शिप्टमध्येवादळी वाऱ्यामुळे जिल्हाभरातील जवळपास १९ शाळांचे नुकसान झाले होते. त्यापैकी १४ शाळांची दुरुस्ती करण्यात आली. मात्र उर्वरित पाच शाळा दुरुस्तीबाहेर गेल्या होत्या. यामध्ये हाडोंग्री, मेडसिंगा, भूसणी, कावलदरा आणि आवारपिंपरी येथील शाळांचा समावेश आहे. मेडसिंगा येथील शाळा दोन शिफ्टमध्ये भरविण्यात आली. सकाळच्या सत्रात पाचवी ते आठवी आणि दुपारच्या सत्रामध्ये पहिली ते चौथीचे वर्ग भरविण्यात आले. तर उर्वरित गावांमध्ये पर्यायी व्यवस्था केली होती.
मुख्याध्यापकाला नोटीस
जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी खानापूर येथील शाळेला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वागतासंबंधी पूर्व तयारी केली नसल्याचे आढळून आले. त्यावर रावत यांनी मुख्याध्यापक एस.बी. आडसूळ यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्यावर कामामध्ये अक्षम्य दूर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Web Title: 15,831 new 'go to school'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.