१५ टक्के हातपंप आटले
By Admin | Updated: June 19, 2014 00:53 IST2014-06-19T00:51:05+5:302014-06-19T00:53:53+5:30
औरंगाबाद : महापालिकेने ९९ वॉर्डांमध्ये घेतलेल्या आजपर्यंतच्या हातपंपांपैकी १५ टक्के हातपंप आटल्याची, तर २० टक्के पंप आपोआप बुजल्याची माहिती पुढे आली आहे.

१५ टक्के हातपंप आटले
औरंगाबाद : महापालिकेने ९९ वॉर्डांमध्ये घेतलेल्या आजपर्यंतच्या हातपंपांपैकी १५ टक्के हातपंप आटल्याची, तर २० टक्के पंप आपोआप बुजल्याची माहिती पुढे आली आहे. २१० हातपंप आटले आहेत, तर २४० हातपंप बुजले गेले आहेत. भूजल पातळी खोलवर चालल्यामुळे हे संकट ओढावले आहे.
चालू वर्षात मनपाने फक्त ३ ठिकाणी पंप खोदले. मात्र, त्यांनाही पाणी लागले नाही. भूजल पातळी खोलवर गेल्यामुळे हातपंपांना सरत्या उन्हाळ्यात पाणी राहिले नाही. पाणीपुरवठा करण्यात पालिका कमी पडल्यामुळे नगरसेवकांनी स्वेच्छा निधीतून शहरातील वॉर्डांमध्ये हातपंप खोदण्याचे धोरण राबविले. यांत्रिकी विभागाचे उपअभियंता यू. जी. शिरसाठ यांनी सांगितले की, यावर्षी ३ पंप खोदले. भूजल पातळी खोलवर गेल्यामुळे पंप घेण्याचे प्रमाण कमी केले आहे.
असे आले धोरण...
१९९० नंतर शहरात गुंठेवारी वसाहतींची निर्मिती झपाट्याने होऊ लागली. पालिका त्या वसाहतींना अनधिकृत असल्यामुळे पाणीपुरवठा करीत नव्हती. प्रत्येक वॉर्डात १५ हातपंप पालिकेने खोदले. सार्वजनिक जागा पाहून ते पंप खोदण्यात आले. भूजल पातळी आटत गेली व घरे वाढत गेले, तसे हातपंप बुजले आणि आटले.
२०१४ मध्ये तीन हातपंप
चालू वर्षात पडेगाव, मिसारवाडी, नारेगाव वॉर्डांमध्ये एकेक हातपंप खोदला. दीड लाख रुपयांचा खर्च त्यावर झाला. ते तिन्ही हातपंप आटले आहेत. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात पालिकेने पंप खोदले नाहीत.
७५ लाखांचा खर्च
दरवर्षी हातपंपासाठी ५ लाख रुपयांची तरतूद केली जाते. आजवर ७५ लाख रुपये हातपंप खोदण्यात गेले आहेत. ज्या पंपांना पाणी आहे, त्या पंपांची गेल्या वर्षी पाहणी करण्यात आली होती.
भूजल पातळी खोलवर
शहराची भूजल पातळी खोलवर गेली आहे. त्यासाठी अनेक कारणे असून, पहिले कारण म्हणजे वाढते काँक्रिटीकरण होय. एसटीपी नसल्यामुळे नाल्यातून वाहणारे सांडपाणी जमिनीतील पाणी दूषित करीत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत १ टक्क्याने भूजल पातळी घटली आहे. गेल्या वर्षी १४.१४ टक्के इतका पाणीसाठा होता. यावर्षी मेअखेरपर्यंत १३.१० टक्के पाणीसाठा भूजल सर्वेक्षण विभागाला आढळून आला आहे.