‘त्या’ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
By Admin | Updated: September 3, 2015 00:27 IST2015-09-02T22:38:27+5:302015-09-03T00:27:31+5:30
जालना : येथील अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील अपहार प्रकरणातील आरोपी जिल्हा व्यवस्थापक मधुकर बापूराव वैद्य व लिपीक अशोक एकनाथ खंदारे यांची

‘त्या’ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
जालना : येथील अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील अपहार प्रकरणातील आरोपी जिल्हा व्यवस्थापक मधुकर बापूराव वैद्य व लिपीक अशोक एकनाथ खंदारे यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
जालना येथील अण्णा भाऊ साठे विकास महामंडळात १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१५ या आर्थिक वर्षात जिल्हा व्यवस्थापक मधुकर बापूराव वैद्य व लिपीक अशोक एकनाथ खंदारे यांनी संगनमत करून महामंडळाच्या ८ कोटी ५७ लाख ८८६ रूपयाच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक अनिल म्हस्के यांच्या फिर्यादीवरून २३ एप्रिल रोजी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
आला होता. हा तपास हाती आल्यानंतर सीआयडीने २४ आॅगस्ट रोजी व्यवस्थापक मधूकर वैद्य व लिपीक खंदारे यांना अटक केली होती. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता २९ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर २ सप्टेंबरपर्यंत वाढ देण्यात आली होती. बुधवारी मुदत संपल्याने सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी दुपारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
यावेळी सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी आरोपींकडून काही महत्वाच्या फायली मिळाल्या नाहीत. त्यामुळे पाच दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती. तसेच आरोपींच्या वकीलांनी दोन वेळेस पोलिस कोठडी घेतली. त्या दरम्यान आरोपींच्या घराची व नातेवाईकांच्या घराची झडती घेण्यात आली. मात्र काही हाती लागले नाही. तसेच हा याच पद्धतीचा अपहाराचा गुन्हा इतर जिल्ह्यातही घडलेला आहे. त्यामुळे हा गुन्हा वरिष्ठांच्या सांगण्यावरून झालेला असवा, असा युक्तिवाद करण्यात आला.