१३३ गावांत पाणीबाणी !
By Admin | Updated: May 25, 2014 01:31 IST2014-05-25T01:20:55+5:302014-05-25T01:31:21+5:30
औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल १३३ गावांतील नागरिक ‘पाणीबाणी’ने परेशान झाले आहेत.

१३३ गावांत पाणीबाणी !
औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल १३३ गावांतील नागरिक ‘पाणीबाणी’ने परेशान झाले आहेत. या गावकर्यांसाठी टँकरर्सची व्यवस्था करण्यात आली असली तरी नागरिकांना पाण्यासाठी दिवसरात्र भटकंती करावी लागत आहे. पैठण तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई असून येथे ३२ गावकर्यांची तहान टँकरद्वारे भागविली जात आहे. सर्वात कमी तीन टँकर कन्नड तालुक्यात आहेत. खुलताबाद तालुका टँकरमुक्त आहे, एवढाच काय तो जिल्ह्याला दिलासा. मान्सून अगदी काही दिवसांवर आल्याने शेतीतील कामे करायची की अख्खा दिवस पाण्यात घालवायचा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
संजय जाधव , पैठण पैठण तालुक्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून, तालुक्याची तहान भागविण्यासाठी ३२ गावांत ५१ टँकर ९९ खेपा मारत आहेत, तर २३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. याशिवाय आणखी पाच गावांनी टँकरने पाणीपुरवठा करावा म्हणून पंचायत समिती प्रशासनाकडे मागणी केली आहे. उन्हाचा पारा चाळिशी पार करीत असताना पाणीटंचाईची दाहकता वाढतच आहे. तालुक्यातील दादेगाव बु., दादेगाव खु., हार्षी बु., हार्षी खु., नांदर, मुधलवाडी, आखतवाडा, रहाटगाव, नानेगाव, पाचलगाव, सोनवडी, सोनवाडी (खु.), डेरा, थापटी, थापटी तांडा, लिंबगाव, रांजणगाव दांडगा, एकतुनी, पाचोड, थेरगाव, कुतूबखेडा, करंजखेडा, चितेगाव, पुसेगाव, खेर्डातांडा, यासीनपूर, बंगलातांडा, नरसिंह तांडा, ढाकेफळ, कारकीन आदी गावांत ५१ टँकरने ९९ खेपा टरण्यात येत आहेत. येथील फारोळा मनपा पॉइंट, मुधलवाडी एमआयडीसी पॉइंट आदींसह खंडाळा, कुतूबखेडा, वडजी, थापटी, पाचोड, कोळीबोडखा आदी ठिकाणच्या विहिरी अधिग्रहित करून टँकर भरणा करण्यात येत आहे. टँक पाटेगाव, टाकळी पैठण, पैठणखेडा, वडाळा, बन्नी तांडा, दोरखेडा, चांगतपुरी आदी गावांनी टँकरची मागणी केली असल्याचे कनिष्ठ अभियंता सुधाकर काकडे यांनी सांगितले. टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना देण्यात यावेत, अशी मागणी पंचायत समितीचे सभापती विलास भुमरे यांनी केली आहे.
विजय गायकवाड , वैजापूर मे महिन्यात तालुक्यात पाणीटंचाईने डोके वर काढले असून, पिण्याच्या पाण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतीमार्फत टँकरची मागणी होत आहे. सद्य:स्थितीत तालुक्यातील २४ गावांना ३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, ५० खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, याशिवाय ६ गावांकडून टँकरची मागणी करण्यात आली आहे. शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्पासह कोल्ही, भटाणा, सटाणा, गाढेपिंपळगाव, बोर दहेगाव हे लघु व मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. त्यामुळे मार्चपासूनच पाणीटंचाई आहे. बाबतारा, परसोडा, धोंदलगाव, शिवराई, माळीसागज, पालखेड, टाकळीसागज, कनकसागज, चोरवाघलगाव, गोळवाडी, सवंदगाव, तिडी, संजरपूरवाडी, सावखेड, खंडाळा, रघुनाथपूरवाडी, भिवगाव, पेंडेफळ, लोणी बु., लोणी खुर्द, रामनगर, हडसपिंपळगाव, बोरसर, आघूर व रोटेगावला टँकरद्वारे पुरवठा सुरू आहे. वैजापूर ग्रामीण २, भगूर, मकरमतपूरवाडी, एकोडीसागज,बेलगाव व हिंगोणीकडून टँकरची मागणी आहे.
सुरेश चव्हाण , कन्नड मे महिन्यातील तीव्र उष्णतेबरोबरच तालुक्यातील पाणीटंचाईची तीव्रता झपाट्याने वाढू लागली आहे. सद्य:परिस्थितीत तालुक्यात तीन गावांना तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, तर २६ गावांना ३१ विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील मोहरा, जवखेडा बु. व आडगाव (पि.) येथे तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आगामी दिवसात कोळसवाडी, डोंगरगाव, कळसुबाईवाडी, मोहाडी, टाकळी बु., जवखेडा खु., नाचनवेल, सारोळा, दिगाव, खेडी, खामगाव व खापरखेडा येथे टँकरने पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे. ३१ विहिरी अधिग्रहित केल्या असल्या तरी फक्त पाच विहिरींचेच आदेश निघाले आहेत, अशी माहिती पंचायत समिती कार्यालयामधून मिळाली. आमदाबाद, नाचनवेल, कोळवाडी (शेलगाव) येथे विहीर खोलीकरण करण्यात आले आहे, तर सारोळा (राजपूतवस्ती), सारोळा (दलितवस्ती), नादरपूर व नादरपूरवाडी येथे प्रत्येकी एक विंधन विहीर घेण्याबाबत मान्यता मिळाली आहे. मागील वर्षी तालुक्यात दुष्काळ होता. त्या परिस्थितीत ५२ गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता, तर २२० खाजगी विहिरी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यावर्षी नाचनवेल जि.प. गट वगळता सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने पाणीटंचाईची तीव्रता कमी आहे. तथापि, नाचनवेल गटात मात्र ही तीव्रता जास्त प्रमाणात आहे
.राजू दुतोंडे , सोयगाव तालुक्यात अद्याप पाणीटंचाईच्या झळा तीव्र झालेल्या नाहीत. एकही टँकरचा प्रस्ताव नाही. माळेगाव पिंप्री आणि घाणेगाव या दोन गावांत विहिरी अधिग्रहित केल्या जाणार आहेत. २५ वर्षांपासून नळ योजना बंद असलेल्या फर्दापूर गावात पाणीटंचाई जाणवत आहे. ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागत असताना ग्रामपंचायतीने अद्याप टँकरचा प्रस्ताव पंचायत समितीला दिलेला नाही. सोयगाव शहराचाच भाग असलेल्या शिवाजीनगर, प्राध्यापक कॉलनी, रामकृष्णनगर या भागांत नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सोयगाव तालुक्यात निसर्गाच्या कृपेमुळे चांगला पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत पाणीटंचाई भासत नाही. यंदा माळेगाव पिंप्री व घाणेगाव या दोन गावांचा विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव पंचायत समितीला प्राप्त झाला. तो तहसील कार्यालयाने मंजूर केला असून लवकरच या दोन गावांत विहीर अधिग्रहण केली जाणार आहे. टँकरसाठी अद्याप कुठल्याही गावाचा प्रस्ताव आलेला नाही. अजिंठा लेणीच्या पायथ्याशी असलेल्या फर्दापूरमध्ये बारमाही पाणीटंचाई असते. गेल्या २५ वर्षांपासून गावात नळ योजना नाही. संपूर्ण गाव कूपनलिकेवर अवलंबून आहे. उन्हाळ्यात या कूपनलिका आटतात, त्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. यंदाही पाणीटंचाई भासू लागलेली आहे. ग्रामस्थ पाणी विकत घेत आहेत. टँकर सुरू करा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत; परंतु गावातील या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
राजू वैष्णव , सिल्लोड तालुक्यातील २३ गावांमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, २५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. अंधारी व पळशी येथे प्रत्येकी दोन अशा ४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यंदा पावसाच्या मेहरबानीने बहुतांश गावांमध्ये विहिरींना मुबलक पाणी होते. मे महिन्याच्या सुरुवातीला तालुक्यातील २३ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने यंदा पाणीटंचाई दरवर्षीप्रमाणे भासली नाही. तालुक्यात पावसाच्या मेहरबानीने तालुक्यातील काही गावांमध्ये मे महिन्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. तालुक्यातील म्हसला (बुर्द), उपळी, आसडी, धानोरा, अंधारी, सिसारखेडा, वांजोळा, मोढा खुर्द, डोंगरगाव, सिसारखेडा वाडी, दीडगाव, खातखेडा, कोºहाळा तांडा, लोणवाडी, बोरगाव बाजार, मुखपाठ, मोढा (बु.) वस्ती, पळशी, पालोद या गावांसाठी २५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. अंधारी व पळशी या दोन गावांना ४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
रऊफ शेख , फुलंब्री फुलंब्री तालुक्यात २९ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून सात गावांना टँकरद्वारे पाणी देण्यात येत आहेत. फुलंब्री तालुक्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत पिण्याच्या पाण्याची ओरड दिसून येत नाही. गेल्या वर्षी या काळात सुमारे ५५ टँकर सुरू होते. यंदा केवळ सात टँकर सुरू आहेत. तालुक्यातील काही भागांत गेल्या वर्षी शेवटच्या टप्प्यात पाऊस पडल्याने पाणीटंचाई निर्माण झाली नाही. यंदा पाणीटंचाई मे महिन्यातच सुरू झाली. येत्या जून महिन्यापर्यंत अशीच परिस्थिती राहील. आणखी काही गावांचे टँकरसाठी प्रस्ताव आलेले आहेत. फुलंब्री तालुक्यात ५८ गावांत १३८ विंधन विहिरी घेण्यासाठी मंजुरी मिळालेली असली तरी केवळ ३३ गावांतच काम सुरू आहे. उर्वरित गावांत ग्रामपंचायतकडून प्रपत्र-ब भरू न न दिल्यामुळे ते काम सुरू होऊ शकले नाही. पाणीटंचाई नियंत्रणात फुलंब्री तालुक्यात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीटंचाई निर्माण झालेली नाही. ज्या गावात टँकर सुरू आहे, तसेच विहीर अधिग्रहण केलेले आहे तेथे अधिकारी वर्ग लक्ष देऊन आहे.
लालखाँ पठाण , गंगापूर तालुक्यात पाणीटंचाई निवारण करण्यासाठी प्रशासनाकडून २१ टँकरसह २२ गावांतील २६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले; मात्र पाण्यासाठी नागरिकांची ओरड सुरूच आहे. सर्वत्र पाणी देण्यास प्रशासन हतबल झाले आहे. तहसील कार्यालयात अनेक टँकर प्रस्ताव लालफित कारभारात अडकले आहेत. वाढत्या उन्हाच्या पार्यामुळे अनेक विहिरींनी तळ गाठला, तर पाझर तलावदेखील सुरुवातीपासूनच कोरडे आहेत. प्रामुख्याने शेंदुरवादा, तुर्काबाद, वाळूज, अंबेलोहळ, हर्सूल सावंगी, लासूर स्टेशन परिसरातील गावांमधून पाणीटंचाईचे संकट वाढत आहे. तालुक्यातील २२ गावांतील २६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले, तर आंबेगाव- ३ टँकर, लासूर स्टेशन- ६ टँकर, आसेगाव- २ टँकर, तुर्काबाद- ३ टँकर, जिकठाण-१, येसगाव-१, वजनापूर शेकटा-१, बुट्टेवाडगाव-१, गाजगाव, खादगाव देर्डा-३ असे २१ टँकर सुरू आहेत, तर घोडेगाव, कासोडा, फुलशिखरा, कोळघर, कनकोरी, दिघी काळेगाव, वाळूज, काटेपिंपळगाव येथील प्रस्ताव दीड महिन्यापासून प्रलंबित आहेत. पळसगाव व शहापूरला प्रपत्र ‘ब’ न मिळाल्याने येथील नागरिक टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.