वाळूची अवैध वाहतूक करणारे १२ ट्रक पकडले
By Admin | Updated: September 14, 2014 00:06 IST2014-09-14T00:06:33+5:302014-09-14T00:06:33+5:30
पैठण : अवैध वाळू वाहतूक करणारे १२ ट्रक पैठण पोलिसांनी शनिवारी जप्त करून ठाण्यात जमा केले आहेत.

वाळूची अवैध वाहतूक करणारे १२ ट्रक पकडले
पैठण : अवैध वाळू वाहतूक करणारे १२ ट्रक पैठण पोलिसांनी शनिवारी जप्त करून ठाण्यात जमा केले आहेत. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या संयुक्त झालेल्या बैठकीत २ ब्रास वाळू वाहतुकीस परवानगी देण्यात आली होती व वाळू वाहतूक करताना जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेले परवानापत्र ट्रकवर लावणे बंधनकारक करण्यात आले होते. कारवाई करण्यात आलेल्या ट्रकवर हे परवानापत्र लावण्यात आले होते. या पत्रानुसार ट्रक टाकळी अंबड वाळूपट्ट्यातून भरून देण्यात आलेले होते.
पोलीस निरीक्षक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अंकुश पाटोळे, जमादार दिलीप औताडे, सिराज पठाण, संतोष चव्हाण, भागीनाथ धटिंग, कोटलवार आदींच्या पथकाने, पैठण-औरंगाबाद रोड, पैठण-शहागड रोड व सोलनापूर फाट्याजवळ कारवाई करीत क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक करणारे ट्रक जप्त केले. हे ट्रक पोलीस ठाण्यासमोर उभे करण्यात आले आहेत. एमएच-२० सीटी-६३१८, एमएच-२० एटी-२९८८, एमएच-२० एटी-६१८१, एमएच-२० बीटी-९४४५, एमएच-२० एटी-८६७७, एमएच-२० बीटी-९४४६, एमएच-२० एटी-७४४९, एमएच-२० एटी-५२१९ व एमएच-२० सीटी-४८३८ या क्रमांकाचे ट्रक जप्त करण्यात आले आहेत.
२ ब्रासची पावती देऊन क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून देण्याचा सपाटा टाकळी अंबड येथील ठेकेदाराने सुरू केला आहे. पावतीपेक्षा जास्त वाळू भरून दिल्याप्रकरणी महसूल प्रशासनाने या ठेकेदारास नोटीसही बजावली आहे. प्रशासनाच्या या नोटिसीला धुडकावीत ठेकेदार आशिष शर्मा याने क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून देत शासनाचे मोठे नुकसान केले आहे. या प्रकरणी ठेकेदारावर जिल्हा प्रशासनाकडून कारवाई होते की अभय दिले जाते, याकडे लक्ष लागले आहे.