छत्रपती संभाजीनगर : महापालिका प्रशासनाने शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी मंगळवारपासून व्यापक मोहीम सुरू केली. या मोहिमेचा श्रीगणेशा बीड बायपासच्या उत्तर दिशेपासून झाला. देवळाई चौक ते महानुभव आश्रमापर्यंत ११८ अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. बुधवारी सकाळी ९ वाजेपासून पुन्हा याच भागात मोहीम सुरू होणार आहे.
महानगरपालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी शहरातील मुख्य रस्त्यांवर होणारी वाहतूककोंडी लक्षात घेत अतिक्रमणे काढण्याचे निर्देश दिले. चार दिवसांपूर्वीच मनपाने कोणत्या रस्त्यांवर कारवाई करणार याचे जाहीर प्रकटन दिले होते. व्यापाऱ्यांनी स्वत:हून आपली अतिक्रमणे काढली नाहीत. मंगळवारी सकाळी ११ वाजता देवळाई चौकात नागरी मित्र पथकाचे ४० कर्मचारी, अतिक्रमण हटाव विभागाचे २०, नगररचना विभागाचे ३, अतिक्रमण हटावचे ५ अधिकारी, ४ जेसीबी, २ टिप्पर, विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी हायड्रोलिक वाहन असा, ताफा दाखल झाला. देवळाई चौकातील भुयारी मार्गाच्या बाजूने, वरच्या भागात दुकानांची अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. यावेळी जमावाने विरोध करण्याचा प्रयत्न केला. विरोध मोडून कारवाई केली.
१ लाख ३५ हजार दंडसर्व्हिस रोडवर असलेली दुकाने एकानंतर एक पाडण्यास सुरुवात केली. लहान मोठे गॅरेज, हॉटेल्स, बँकांचे अतिरिक्त बांधकाम, रुग्णालये, शेड, टपऱ्या आदी अतिक्रमण पाडण्यात आले. या कारवाईत व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. काही व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत १ लाख ३५ हजार रुपये दंडही वसूल केला. ही कारवाई सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे, उपायुक्त सविता सोनवणे, सहायक आयुक्त भरत भिरारे, राहुल जाधव, अर्जुन गिराम, नगररचना विभागाचे अभियंता शिवाजी लोखंडे, सौरभ साळवे, सुरज संवदकर, इमारत निरीक्षक शिवम घोडके, कुणाल भोसले, रवींद्र देसाई, सागर श्रेष्ठ, अशोक कदम, नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव यांनी केली.
आज दक्षिण बाजूला कारवाईमंगळवारी बीड बायपासवर उत्तर दिशेला कारवाई केली. बुधवारी सकाळी ९ वाजेपासून दक्षिण दिशेला म्हणजेच बजाज हॉस्पिटलकडील भागात कारवाई करण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे असे आवाहन अतिक्रमण हटाव विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी केले.
जालना रोड, पैठण रोडबीड बायपास रोडवरील कारवाई पूर्ण झाल्यानंतर जालना रोडवर कारवाई करण्यात येणार आहे. जालना रोडवर दोन्ही बाजूने कारवाई पूर्ण होताच पैठण रोडकडे मोर्चा वळविण्यात येणार असल्याचे मनपातर्फे कळविण्यात आले.