‘तेरणा’मध्ये ११.४२ टक्के पाणीसाठा
By Admin | Updated: July 25, 2014 00:29 IST2014-07-25T00:20:59+5:302014-07-25T00:29:17+5:30
तेर : तेरणा धरण क्षेत्रामध्ये ८ जुलै रोजी झालेल्या पावसामुळे पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे.

‘तेरणा’मध्ये ११.४२ टक्के पाणीसाठा
तेर : तेरणा धरण क्षेत्रामध्ये ८ जुलै रोजी झालेल्या पावसामुळे पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे. आज घडीला या प्रकल्पामध्ये ११.४२ टक्के इतका पाणीसाठा आहे.
जिल्हाभरात अद्याप दमदार पाऊस न झाल्याने बहुतांश प्रकल्प कोरडे आहेत. रिमझिम स्वरुपाच्या पावसावर पेरण्या सुरु झाल्या असल्या तरी पाण्याचा प्रश्न मात्र कायम आहे. असे असतानाच ८ जुलै रोजी तेरणा धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठा २.६५ वरुन ११.४२ वर जावून ठेपला आहे. धरणाची पाणी पातळी वाढल्यामुळे परिसरातील गावांना तात्पुरता का होईना दिलासा मिळाला आहे. (वार्ताहर)
२० लाख घनमिटर क्षमता
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील तेरणा नदीवर १९६३ साली हे धरण उभारण्यात आले. या धरणाची क्षमता २० लाख घनमिटर इतकी असून, येथूनच उस्मानाबाद शहरासह तेर, येडशी, ढोकी, तडवळा या गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.
धरण पडले कोरडेठाक
नोव्हेंबर २०१२ मध्ये हे धरण पूर्णत: कोरडेठाक पडले होते. तेंव्हा तेर, ढोकी, तडवळा, येडशीसह परिसरातील अनेक गावांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत होत्या. आजही अनेक गावांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यानंतर आॅगस्ट २०१३ मध्ये गणेशोत्सव काळात झालेल्या पावसामुळे तेरणा धरणामध्ये ३० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला होता. त्यानंतर या पाणी पातळीत घट झाली. ७ जुलै २०१४ रोजी प्रकल्पात केवळ २.६५ टक्के पाणीसाठा होता. मात्र ८ जुलै रोजी झालेल्या पावसाने आता ११.४२ टक्के इतका साठा झाला आहे.