दहावीची परीक्षा रद्द, पण शुल्क परतीचे काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:02 IST2021-05-17T04:02:21+5:302021-05-17T04:02:21+5:30

औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावीची वार्षिक परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत ...

10th exam canceled, but what about fee refund? | दहावीची परीक्षा रद्द, पण शुल्क परतीचे काय ?

दहावीची परीक्षा रद्द, पण शुल्क परतीचे काय ?

औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावीची वार्षिक परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणे अपेक्षित असून, जिल्ह्यातून २ कोटी ९० लाख ७२ हजार ८२५ रुपयांचे शुल्क ७० हजार ५५ विद्यार्थ्यांना परत कधी मिळणार, याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना आहे.

जिल्ह्यात सर्व बोर्डांच्या एकत्रित १०८६ शाळांत दहावीचे ७३,२४९ विद्यार्थी शिकतात. त्यात राज्य मंडळाच्या १०३२ शाळांत ७० हजार ५५ विद्यार्थी आहेत. सीबीएससी, एसएससी बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी बोर्डाकडे जे शुल्क भरले ते प्रमाणपत्र व मार्क मेमो यांच्या छपाईचा खर्च वजा जाता प्रत्येक बोर्डाने विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करायला हवे. बोर्डाचा ९० टक्के खर्च प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका छपाई, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका विभागात वितरण करण्याचे भाडे वाचले आहे. केंद्रप्रमुख, उपकेंद्र प्रमुख, सुपरवायझर यांचे मानधन, कस्टोडियन, भरारी पथके, परीक्षक, नियामक, मुख्य नियामक यांच्या मानधनाचीही बचत झाली आहे. अशी मागणी औरंगाबाद विभागीय परीक्षा मंडळाचे माजी सदस्य एस. पी. जवळकर यांनी यापूर्वीच केली आहे. आता विद्यार्थ्यांतूनही परीक्षा शुल्क परतीची मागणी जोर धरत आहे.

--

जिल्ह्यातील एकूण माध्यमिक शाळा - १,०३२

प्रति विद्यार्थी परीक्षा शुल्क - ४१५

दहावीतील एकूण विद्यार्थी - ७०,०५५

परीक्षा शुल्काची एकूण रक्कम - २,९०,७२,८२५

---

शिक्षणाधिकारी म्हणतात...

दुष्काळी आणि टंचाई भागातील गेल्या दोन वर्षांचे परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीचे अर्ज मागविण्यात आले होते. त्याची माहिती शाळांकडून मागविली आहे. यावर्षीच्या परीक्षा शुल्कासंबंधी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. शासन आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.

-डाॅ. बी. बी. चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्रभारी सचिव विभागीय परीक्षा मंडळ, औरंगाबाद.

---

पुढे काय होणार? विद्यार्थी संभ्रमात

परीक्षा रद्द झाल्याने आता पुढे अकरावीच्या प्रवेशावेळी आवडत्या महाविद्यालयात प्रवेश घेता येईल का? यावर्षी गुणपत्रिका कशी मिळणार, याचा विचार येतोय. परीक्षा शुल्क परत मिळायला पाहिजे; पण अजून आधीच्या दोन वर्षांच्या विद्यार्थ्यांनाही प्रतिपूर्ती शुल्क परत मिळाले नाही.

-प्राची सोनवणे, विद्यार्थिनी.

---

दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने परीक्षा शुल्क तत्काळ परत मिळायला हवे होते. मात्र, अद्याप बोर्डाकडून कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. विलंबाने अर्ज भरला तर विलंब शुल्क द्यावे लागते, मग विद्यार्थ्यांना शुल्क विलंबाने परत दिले तर त्याचाही दंड मिळाला पाहिजे.

-अश्विन काळे, विद्यार्थी.

---

आतापर्यंतच परीक्षा शुल्क परत मिळणे अपेक्षित होते; पण दुष्काळी दोन वर्षांचेही प्रतिपूर्ती शुल्कही अद्याप बोर्डाकडून विद्यार्थ्यांना परत मिळालेले नाही. त्यामुळे आम्हाला मिळेल की नाही, याबद्दल संभ्रम आहेच; पण आमच्या पुढच्या शिक्षणातील येणाऱ्या अडचणींचे काय, हाही प्रश्न अनुत्तरित आहे.

-इम्रान पटेल, विद्यार्थी.

Web Title: 10th exam canceled, but what about fee refund?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.