१०३ टोलफ्री क्रमांकाची ‘चारसोबीसी’
By Admin | Updated: November 25, 2015 00:21 IST2015-11-25T00:17:37+5:302015-11-25T00:21:35+5:30
राजकुमार जोंधळे , लातूर महिला अत्याचार रोखण्यासाठी राज्यशासनाने सुरु केलेला हेल्पलाईनचा १०३ क्रमांक हा बंद असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमधून समोर आले आहे़

१०३ टोलफ्री क्रमांकाची ‘चारसोबीसी’
राजकुमार जोंधळे , लातूर
महिला अत्याचार रोखण्यासाठी राज्यशासनाने सुरु केलेला हेल्पलाईनचा १०३ क्रमांक हा बंद असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमधून समोर आले आहे़ मंगळवारी या हेल्पलाईनवर लातूर जिल्ह्यातील २५ नागरिकांनी आपल्या मोबाईलवरुन संपर्क साधला़ मात्र हा हेल्पलाईन क्रमांकच बंद असल्याचे पुढे आले़ एकीकडे हेल्पलाईन घोषित करुन ‘सुरु’ करायची आणि दुसरीकडे ती प्रत्यक्षात सुरु न करता कागदावरच ठेवायची, अशी शुद्ध फसवणूक शासन व पोलिस प्रशासन यांच्याकडून झाली आहे़ या चारसोबीसीचा बुरखा फाडणारे ‘लोकमत’चे हे स्टिंग आॅपरेशऩ
राज्य शासनाच्या वतीने महिला अत्याचार रोखण्यासाठी खास हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे़ महिलांविषयीच्या तक्रारी या हेल्पलाईनच्या माध्यमातून थेट नोंदविता याव्यात यासाठी या हेल्पलाईनची निर्मिती करण्यात आली आहे़ ही हेल्पलाईन म्हणजे ‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न’ असाच प्रकार आहे़ महिला संदर्भात शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना किती सक्षम आहेत़ याचा हा पुरावा म्हणून या हेल्पलाईनच्या अकार्यक्षमतेकडे पाहता येईल़ महिलांची सुरक्षा आणि सबलीकरण याबाबत राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्रालय आणि गृहमंत्रालयाच्या वतीने विविध योजना अंमलात आणल्या जातात़ अशा योजनांची घोषणाही दिमाखदार सोहळ्यामध्ये केली जाते़ त्यानंतर या योजनेचा कसा बोजवारा उडतो़ हे प्रत्यक्ष नागरिकांना अनुभवास मिळते़ ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आलेल्या स्टींग आॅपरेशनमुळे या हेल्पलाईनचा पर्दाफाश करण्यात आला़ मंगळवारी जिल्हाभरातील वेगवेगळ्या भागातील एकूण २५ नागरिकांनी १०३ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ या टोलफ्री क्रमांकावरुन कुठलाही प्रतिसाद नागरिकांना मिळाला नाही़ या हेल्पलाईनवरुन कुठलाही संदेश दिवसभरात नागरिकांना मिळाला नाही़ नेमकी ही हेल्पलाईन बंद आहे किंवा सुरु आहे असा साधा संदेशही मोबाईलकर्त्यांना मिळाला नसल्यामुळे त्यांची निराशा झाली़ एकीकडे हेल्पलाईन सुरु झाल्यानंतर ती काही दिवसाच्या आत बंद असल्याचे समोर येते़ या हेल्पलाईन बाबत कार्यरत असणारी यंत्रणा किती गंभीर आहे़ हे यातून समोर आले आहे.
राज्य शासनाच्या वतीने महिलांच्या संदर्भात सुरु करण्यात येणाऱ्या योजना या बहुतांश महिलांपर्यंत जनजागरण आणि प्रबोधनाचा अभाव असल्यामुळे पोहोचत नाहीत़ या योजनासंदर्भात अपेक्षित असलेली माहितीही तळागळातील महिलांपर्यंत पोहोचत नाही़ असाच प्रकार राज्य शासनाच्या १०३ क्रमांकाच्या टोलफ्री हेल्पलाईन विषयी घडला आहे़ या टोलफ्री विषयी महिलांना यंत्रणेकडून कुठलीही माहिती देण्यात आली नाही़ काही महिलांना ही हेल्पलाईन सुुरु केल्याची साधी माहितीही त्यांच्याकडे नाही़