बस-कार अपघातात १० प्रवाशी गंभीर
By Admin | Updated: April 6, 2016 00:50 IST2016-04-06T00:23:56+5:302016-04-06T00:50:01+5:30
तामलवाडी : भरधाव वेगातील बसने कारला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात १० प्रवाशी गंभीर जखमी झाले़ हा अपघात

बस-कार अपघातात १० प्रवाशी गंभीर
तामलवाडी : भरधाव वेगातील बसने कारला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात १० प्रवाशी गंभीर जखमी झाले़ हा अपघात सोलापूर- औरंगाबाद महामार्गावरील माळुंब्रा शिवारात मंगळवारी सकाळी घडला़ अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला पलटी झाली़ अपघातातील जखमींना उपचारासाठी तुळजापूर, सोलापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील माळुंब्रा शिवारात मंगळवारी सकाळी सोलापूरकडे जाणाऱ्या बसने (क्ऱएम़एच़२०- बी़आय़२१८५) तुळजापूरकडे निघालेल्या कारला (क्ऱएम़एच़४२- के़ ३५०९) जोराची धडक दिली़ या भीषण अपघातात दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला जावून पडली़ अपघातात कारमधील पाचजण तर बसमधील पाच जण गंभीर जखमी झाले़ अपघातानंतर सांगवी मार्डी, माळुंब्रा येथील तरुणांनी घटनास्थळी दाखल झालेल्या तामलवाडी पोलिसांबसोबत मिळून वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना व भाविकांना बाहेर काढले़
या अपघातात विनोद विश्वनाथ जगताप (वय-५२), प्रिया शशिधर पाडे (२२), सितादेवी शशिधर पाडे (वय-४५ सर्व रा़ बारामती जि़पुणे), सिध्दार्थ पाडे (वय-५५), बसचालक अनिल भगवान बारकूल (वय-४८), प्रतिभा कदम (वय-३० रा़तुळजापूर), प्रकाश रामचंद्र कदम (वय-५६ रा़तुळजापूर) यांच्यासह दहा जण जखमी झाले़ जखमींना तुळजापूर, सोलापूर येथील रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे़
दरम्यान, एसटी आणि कारच्या धडकेनंतर एसटी रस्त्यालगतच्या दहाफूट खोल खोदलेल्या चारीमध्ये पडली. एसटीतील अनेकांना किरकोळ मार लागला असून, ३० ते ४० प्रवाशांनी संकटकालीन खिडकीतून बाहेर येण्यासाठी मार्ग काढला. अपघातानंतर महिला व पुरुष प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. तसेच कारमधील प्रवाशी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
चारी खोदाईमुळे अपघात
राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे़ मात्र, माळुंब्रा शिवारात सुरू असलेल्या कामाबाबतचे सूचनाफलक लावण्यात आलेले नाहीत़ एका बाजूच्या रस्त्याचे काम झाले असून, जुन्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी चारी खोदण्यात आली आहे़ त्यामुळे वाहनांना एकमेकांना साईड देता येत नाही़ वाहन थोडेही खाली गेले तर अपघात होण्याची शक्यता वाढली असून, आजचा अपघातही या खोदण्यात आलेल्या चारीमुळे झाल्याचे दिसत आहे़ संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)