दोन रुपयांमध्ये दहा लिटर शुद्ध पाणी!
By Admin | Updated: May 26, 2014 01:19 IST2014-05-26T01:09:42+5:302014-05-26T01:19:19+5:30
साहेबराव हिवराळे , औरंगाबाद शहरी भागात राहणार्या नागरिकांना आज शुद्ध पाणी मिळत आहे.

दोन रुपयांमध्ये दहा लिटर शुद्ध पाणी!
साहेबराव हिवराळे , औरंगाबाद शहरी भागात राहणार्या नागरिकांना आज शुद्ध पाणी मिळत आहे. मात्र, आजही ग्रामीण भागात क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गांधेली ग्रामपंचायतीने दोन रुपयांच्या क्वाईनमध्ये १० लिटर शुद्ध पाणी देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. मागील काही वर्षांपासून ग्रामपंचायतीने गावातील सफाई, व्यावसायिक दृष्टिकोन, शेतातील पाण्याचे योग्य नियोजन इत्यादी उपक्रम राबविले. गावाने एकात्मिक पाणलोट विकास व्यवस्थापन कार्यक्रमातही आघाडी घेतली. जवळपास एक कोटी रुपये खर्च करून गावविकासाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम केले जात आहे. पाणी हा सर्वांत मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. ग्रामपंचायतीने गावाला शुद्ध पाणी देण्याचे धोरण स्वीकारले. पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकून पाणीपुरवठा करण्याऐवजी प्लांटमध्ये शुद्ध केलेले पाणी गावाला वाटप करण्याची योजना ग्रामसभेत मंजूर करण्यात आली. शुद्ध पाण्याचा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. ज्यांना पाणी हवे असेल त्यांनी दोन रुपये क्वाईन बॉक्समध्ये टाकायचे अन् १० लिटर शुद्ध पाण्याचा जार घेऊन जायचे, असे नियोजन करण्यात आले आहे. ही योजना २४ तास सुरू राहणार आहे. गावात दिवसरात्र पाणी शुद्ध करण्याचे काम सुरू असते, एक लिटर पाण्याची बाटली बाहेरून आणण्यासाठी १५ ते २० रुपये खर्च येतो. त्यापेक्षा थंडगार व शुद्ध दहा लिटर पाणी घरात घेऊन जाणे गांधेलीवासीयांसाठी प्रतिष्ठेचे बनले आहे. शहरात अनेक व्यापारी पाण्याचा जार खरेदी करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे अनेक बेरोजगारांनी शुद्ध पाणीपुरवठ्याची यंत्रणा उभारली आहे. गांधेली गावचे सरपंच राहुल सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, व्यवस्थापन समितीसोबत शुद्ध पाण्याचे विविध प्रकल्प पाहिले. अगदी कमीत कमी किमतीत नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, या दृष्टीने काम करण्यात आले. सर्वांनीच त्यासाठी सहमती दर्शविल्याने गावात आनंदाची लहर निर्माण झाली. या कामासाठी सचिव के.एस. देशपांडे, अरविंद ऐलम, समितीचे सचिव प्रल्हाद तळेकर आदींनी परिश्रम घेतले.