पाण्याअभावी दहा लाख टन ऊस धोक्यात !
By Admin | Updated: June 16, 2014 01:14 IST2014-06-16T00:06:36+5:302014-06-16T01:14:20+5:30
पुरुषोत्तम करवा , माजलगाव तालुक्यातील ऊसाचे क्षेत्र पाण्याअभावी धोक्यात आले आहे़ पावसाने लांबण टाकल्याने शेतकरी धास्तावले आहेत़

पाण्याअभावी दहा लाख टन ऊस धोक्यात !
पुरुषोत्तम करवा , माजलगाव
तालुक्यातील ऊसाचे क्षेत्र पाण्याअभावी धोक्यात आले आहे़ पावसाने लांबण टाकल्याने शेतकरी धास्तावले आहेत़ माजलगाव धरणातील पाणी ऊसासाठी पाटात सोडण्याची मागणी जोर धरु लागली आहे़
माजलगाव येथील धरणाच्या सिंचनक्षेत्रात ऊसलागवड मोठ्या प्रमाणात केली जाते़ जयमहेश, माजलगाव व वैद्यनाथ कारखान्याला येथील ऊस पुरवला जातोे़ एकूण १० लाख टन ऊस पिकविणाऱ्या या तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे़ उसाचे पीक सध्या शेतशिवारात चांगलेच डोलू लागले आहे़ तोडणीला आलेला ऊस पाण्यावाचून करपून जाण्याची भीती निर्माण झाली आहे़ माजलगाव धरणात सध्या आठ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे़ यापैकी काही पाणी सिंदफणा धरणात पंधरा दिवसांपूर्वी सोडले होते़ त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता़ गुरांच्या पाण्याचा व काही प्रमाणात शेतपिकांच्या पाण्याचाही प्रश्न मार्गी लागला होता़ मात्र, हे पाणी ऊस उत्पादकांपर्यंत पोहोचले नाही़ पाण्याची पातळी खालावत चालल्याने विहिरी, बोअरचे पाणी आटत चालले आहे़ ऊस जागेवरच वाळून चालला असून त्यामुळे उत्पदाक शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस भाई गंगाभीषण थावरे यांनी सांगितले़ त्यामुळे पीक वाचवायचे असेल तर माजलगाव धरणातून पाटात तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे़
ढोरगावचा दरवाजा उघडणार
माजलगाव धरणातील पाणी पाटात सोडण्याच्या मागणीसाठी शनिवारी भाजपाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले़ १८ जून रोजी शेतकऱ्यांना सोबत घेऊन ढोरगाव येथे उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस भाई गंगाभीषण थावरे यांनी दिली़ पाणी सोडले नाही तर धरणाचा दरवाजा उघडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे़