छत्रपती संभाजीनगर : खरीप हंगामाची पेरणी सुरू झाली तरी जिल्ह्यातील १ लाख ८७ हजार ९१२ शेतकऱ्यांनी गतवर्षीच्या पीककर्जाचे १ हजार ७०६ कोटी ९५ लाख रुपये थकविले आहेत. जुन्याची परतफेड न करणाऱ्यांना यंदा पीककर्ज मिळणार नाही. या शेतकऱ्यांनी त्वरित जुन्या कर्जाचा भरणा करून नवीन कर्ज घ्यावे, असे आवाहन शिखर बँकेने केले आहे.
दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना नाममात्र व्याजदराने पीककर्ज वाटप विविध बँकांमार्फत होते. गतवर्षी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४ लाख २० हजार ५९१ खातेदारांना ३ हजार ६१२ कोटी ९२ लाख रु. कर्ज वाटप केले होते. गत खरीप हंगामात घेतलेल्या कर्जाची परतफेड यावर्षीच्या ३१ मार्चपूर्वी करणाऱ्या शेतकऱ्यांना अवघ्या तीन रुपये प्रतिशेकडा याप्रमाणे व्याजाची आकारणी होते. मात्र, जिल्ह्यातील एकूण कर्जदार शेतकऱ्यांपैकी १ लाख ८७ हजार ९१२ शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड केली नव्हती. जे शेतकरी मागील पीककर्जाची परतफेड करतील, तेच शेतकरी नवीन कर्जासाठी पात्र ठरतात, असा रिझर्व्ह बँकेचा नियम आहे. पीककर्ज थकविणाऱ्यांना नवीन कर्ज न देण्याचे कडक निर्देश बँकांना आहेत. जिल्ह्यातील १ लाख ८७ हजार ९१२ शेतकऱ्यांनी १ हजार ७०६ कोटी ९५ लाख रुपयांचे पीककर्ज थकविल्याची माहिती जिल्हा शिखर बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. गतवर्षीच्या एकूण कर्जदारांच्या ४५ टक्के शेतकऱ्यांनी ४७ टक्के कर्ज थकविल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ६४ टक्के कर्ज थकलेमहाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून गतवर्षी ५४ हजार ८२१ शेतकऱ्यांना ५८७ कोटी ५६ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले हाेते. महाराष्ट्र बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांनी तब्बल ३७३ कोटी ५७ लाख रु. थकविले आहेत.
बँकांची नावे-----एकूण थकबाकीदार खातेदार----- रक्कमजिल्हा सहकारी बँक- ६४,५८७-------३३७ कोटी २० लाखप्रायव्हेट सेक्टर बँक- २,६६२--------------६४ कोटी ३० लाखमहाराष्ट्र ग्रामीण बँक-- ३३,५५२--- ३७३ कोटी ५७ लाखअन्य राष्ट्रीयीकृत बँका-- ८७ हजार १११--- ९३१ कोटी ८८ लाख
पीककर्जाची परतफेड करावीपीककर्ज वाटप करताना शेतकऱ्यांचा ‘सिबील’ तपासू नये. ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला, त्यांना सात दिवसांत कर्ज देण्याचे निर्देश बँकांना आहेत. शेतकऱ्यांनी मागील पीककर्जाची परतफेड करावी, जेणेकरून नवीन कर्ज मंजूर करणे बँकांना सहज शक्य होईल.- मोघे, व्यवस्थापक, जिल्हा शिखर बँक