घुग्घुस नगरपरिषदेसाठी झेडपीत वादळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:26 IST2017-08-19T00:25:19+5:302017-08-19T00:26:01+5:30
३२ हजार लोकसंख्या असलेल्या घुग्घुस शहराला नगर पालिकेचा दर्जा मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या काँग्रेस सदस्यांनी विशेष सभा घेण्याची मागणी केली होती.

घुग्घुस नगरपरिषदेसाठी झेडपीत वादळ
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ३२ हजार लोकसंख्या असलेल्या घुग्घुस शहराला नगर पालिकेचा दर्जा मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या काँग्रेस सदस्यांनी विशेष सभा घेण्याची मागणी केली होती. या विषयावर शुक्रवारी विशेष सभा बोलाविण्यात आली. मात्र सत्ताधाºयांनी विरोधकांवर दबावतंत्राचा वापर करून नगर परिषदेच्या मागणीला बगल दिल्याचा आरोप काँग्रेस सदस्यांनी केला आहे. याविरूद्ध विरोधकांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर घोषणा देत सत्ताधाºयांचा निषेध नोंदविला. त्यामुळे पुन्हा एकदा सत्ताधाºयांविरूद्ध विरोधकांचा रोष दिसून आला.
जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या २० आणि ४ पंचायत समिती सभापतींनी घुग्घुस नगर परिषद स्थापन व्हावी याकरिता ठराव घेऊन शासनास ठराव पाठविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेची विशेष सभा घेण्यासाठी अध्यक्षांना नोटीस दिली होती. घुग्घुस शहराची लोकसंख्या ३२ हजार ६५४ एवढी असून येथे अद्यापही ग्रामपंचायत अस्तीत्वात आहे. चिमूर व नागभीड येथील लोकसंख्या १५ हजार च्या आत असतानाही शासनाने येथे नगर परिषद स्थापन केली. चिमूर, नागभीड, गडचांदूर येथे नगर परिषद स्थापन व्हावी म्हणून जिल्हा परिषदेमधून ठराव पारीत करण्यात आले होते. परंतु, घुग्घुस येथील लोकसंख्या ३२ हजार ६५४ एवढी असतानाही अजूनही जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव शासनाकडून आला नाही, म्हणून काँग्रेसच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन सभेची मागणी केली होती.
शुक्रवारची सभा वेळेवर सुरू झाली. मात्र काँग्रेसचे सदस्य उपस्थित नव्हते. तेव्हा सत्ताधाºयांनी सभा गुंडाळण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. परंतु सभागृहात काँग्रेस पक्षाचे सदस्य १ वाजताच्या सुमारास उपस्थित झाले व सभागृहात चर्चा करण्यासाठी मागणी केली. तेव्हा सत्ताधारी सदस्यांनी विरोधकांना बोलू दिले नाही. विद्यामन जि. प. अध्यक्ष घुग्घुस ग्रामपंचायतीचे सरपंच असताना ९.५१ कोटीचा घोळ केला होता. हा घोळ पुढे येईल म्हणून हा नगर परिषदेचा विषय दाबण्याचा अध्यक्षांचा प्रयत्न होता. म्हणूनच काँग्रेस सदस्यांना सभेत बोलू दिले नाही, असा आरोप काँग्रेस सदस्यांनी केला आहे.
चिमूर, नागभीड, गडचांदूर व सिंदेवाही येथे जनतेला नगर परिषद , नगरपंचायत स्थापन झाल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा परिषदेकडील गावे नगर परिषदेकडे जाणे यापेक्षा दुर्दैव काय, असे सत्ताधारी सदस्यांचे म्हणणे होते. मात्र जिल्हा परिषदेचा २४ कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळती करण्यात आला, तेव्हा कुठे गेले दुर्दैव, असा प्रतिप्रश्न काँग्रेसच्या सदस्यांनी केला आहे. सभेत चर्चा न करता जि. प. सदस्य नागराज गेडाम यांनी सभेत ठराव नामंजुर करण्याचे मत मांडले व भाजपाच्या सदस्यांनी बाके वाजवून त्यांना समर्थन दिले. मात्र काँग्रेसच्या सदस्यांनी त्यास विरोध करून घुग्घुस नगर परिषद झालीच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. जिल्हा परिषदेच्या दारासमोर सर्व काँग्रेस सदस्यांनी निदर्शने केली.
यावेळी काँग्रेस गटनेता डॉ. सतिश वारजूकर, डॉ. आसावरी देवतळे, गोदरू पाटील जुमनाके, खोजराम मरस्कोल्हे, ममता डुकरे, गजानन बुटके, गोपाळा दडमल, नैना गेडाम, स्मिता पारधी, प्रमोद चिमुरकर, राजेश कांबळे, रूपा सुरपाम, रमाकांत लोधे, सुनंदा जिवतोडे, वैशाली शेरकी, विना मालेकर, शिचंद्र काळे, कल्पना पेचे, नामदेव करमनकर, मेघा नलगे, पंचायत समिती सभापती अरविंद देशमुख, विद्या चौधरी, कुंदा जेनेकर, श्याम रणदिवे उपस्थित होते.
भोजनावर काँग्रेस सदस्यांचा बहिष्कार
जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे घुग्घुस येथील जनतेला मुलभूत सुविधापासून वंचित ठेवत आहेत. घुग्घुस नगर परिषद झाली तर घुग्घुस येथील ९ कोटी ५१ लाखांचा भ्रष्टाचार समोर येण्याची त्यांना भिती आहे. त्यामुळेच ते सर्व निकष पूर्ण करणाºया घुग्घुस शहराला नगरपरिषद स्थापनेपासून वंचित ठेवत असल्याचा आरोप करीत काँग्रेस सदस्यांनी विशेष सभेदरम्यान आयोजित भोजनावर बहिष्कार टाकला.
नगर परिषद स्थापनेचा निर्णय शासनाच्या अखत्यारित येत असून जिल्हा परिषदेने ठराव मंजूर केला किंवा नाही केला तरी शासन विचाराधीन असलेले निर्णय घेत असतो. डॉ. सतिश वारजूकर यांनी चिमूर, सिंदेवाही, नागभीड नगर परिषद स्थापनेसाठी विरोध केला तरीही शासनाने तेथे नगर परिषद स्थापन केली. घुग्घुस नगर परिषद व्हावी हा हट्ट राजकीय हेतुने प्रेरित असून भाजप विकासकामांना प्राधान्य देत असल्याने विरोधक आरोप करित आहेत.
- देवराव भोंगळे, अध्यक्ष,
जि.प. चंद्रपूर.