सिंचनामुळे यंदा रब्बी हंगाम लागवड क्षेत्र वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:48 IST2019-05-09T00:47:04+5:302019-05-09T00:48:27+5:30
तालुक्यात सिंचनाची सुविधा निर्माण झाल्याने रब्बी पिकांच्या लागवड क्षेत्रात कमालीची वाढ झाली. यंदा सुमारे १७७.९ हेक्टर क्षेत्रात भात रोवणी झाली असून भाजीपाला, फुलझाडे, टरबूज व इतर पिकेही शेतकरी घेताना दिसत आहेत.

सिंचनामुळे यंदा रब्बी हंगाम लागवड क्षेत्र वाढले
भोजराज गोवर्धन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : तालुक्यात सिंचनाची सुविधा निर्माण झाल्याने रब्बी पिकांच्या लागवड क्षेत्रात कमालीची वाढ झाली. यंदा सुमारे १७७.९ हेक्टर क्षेत्रात भात रोवणी झाली असून भाजीपाला, फुलझाडे, टरबूज व इतर पिकेही शेतकरी घेताना दिसत आहेत.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी मुबलक निधी देत आहेत. यातुनच चिरोली येथे २ कोटींचा बंधारा बांधण्याचे काम जलदगतीने सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ५ मोठे बंधारे बांधण्यात येणार आहेत. याकामांमुळे सिंचन क्षमतेत वाढ होणार आहे. यासोबतच लघु पाटबंधारे विभागाकडून बंधारे व तलावाच्या गेटचे काम सुरू आहेत. मागील तीन वर्षांपासून तालुका कृषी विभागाने शेततलाव, बोळी, नाला खोलीकरण, गाळ उपसा, बंधारे व जलशिवार योजनेच्या माध्यमातून सिंचनाची विविध कामे पूर्ण केल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात अनेक पिके घेत आहेत. तालुक्यात भातशेती करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. वाघोली बुटी उपसा योजना, हरणघाट उपसा सिंचन व बोरघाट योजनेचे पाणी खरीप हंगामात शेतीकरिता उपलब्ध करून दिल्या जाते. पण, अशा शेतकऱ्यांची संख्या कमी आहे.
त्यामुळे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी चिचडोह प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. या प्रकल्पाचे काम सध्या वेगात सुरू आहे. सदर प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पिके घेण्यासाठी पाणी मिळणार आहे.
नहराची दुरूस्ती अत्यावश्यक
मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी वाघोली बुटी उपसा सिंचन योजना, हरणघाट उपसा सिंचन प्रकल्प उपयुक्त ठरले. परंतु हे प्रकल्प जुने असल्यामुळे अनेक नहराला भेगा पडल्या आहेत. मुख्य कालवा नादुरूस्त असल्याने शेतीपर्यंत पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने तत्काळ दुरूस्ती करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.